पुणे-
३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कलादालन येथे महिलांच्या पेंटिंग्जची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ललित कला अकॅडेमी दिल्लीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले. निवेदिता प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे या महिलांसाठी पेंटिंग स्पर्धेचे आयोजन अनुराधा भारती यांनी केले. उद्घाटन प्रसंगी अॅड अभय छाजेड, डॉ सतीश देसाई, मोहन टिल्लू उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. 9 पर्यंत सकाळी १० ते रात्री ८.३० यावेळेत सर्वांसाठी खुले असेल.
पाचारणे म्हणाले कि, तुमच्या कलेला तुमच्या भूमीचा गंध असला पाहिजे. ज्या मातीवर तुम्ही उभे राहता त्या मातीच्या संस्कारांचे ऋण असले पाहिजे आणि तीच कला श्रेष्ठ. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आदिवासी कलेला (ट्राईबल आर्ट) जगभरातून आजही भारतीय कला म्हणून ओळखले जाते. कला हि विकण्यासाठी नसते. तुमच्या आमच्या कलेला जगाच्या बाजारपेठेत किंमत असली तरी त्यास भारतीयतत्व नाही असा शिक्का लागतो आणि तो पुसण्याची जबाबदारी तुमची आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये आत्ता पर्यंत झालेल्या १२ वर्षातील महिला पेंटिंग स्पर्धांमधील पेंटीगचा कॅटलॉग ललित कला अकॅडेमी तर्फे प्रकाशित केला जाईल असे हि त्यांनी टाळ्यांचा गजरात जाहीर केले.
या स्पर्धेत १०४ महिला कलावंतांनी सहभाग घेतला असून त्यांची एकूण १३० पेंटिंग प्रदर्शित केली गेली. यावेळी अभिनव कला विद्यालय, पुणे याचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव, जयप्रकाश जगताप व प्राध्यापक सुधाकर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर तुलसी ग्रुप आर्ट फौंडेशनचे सुरेश लोणकर व अभिनव कॉलेजचे फाऊंडर कै. पुरम यांची कन्या प्रा. राजेश्वरी कार्ले उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदाचे वर्षी हे निवेदिता प्रतिष्ठान’ तर्फे १२वे चित्र प्रदर्शन आहे. या वर्षी ३ गटात स्पर्धा करण्यात आली. पेंटिंग स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : पहिला गट वॉटर कलर/पोस्टर कलरमध्ये प्रज्ञा काळे (प्रथम) आणि अनन्या गवाडे (द्वितीय), दुसरा गट ऑईल कलर/एक्रीलिक कलरमध्ये सायली कांबळे (प्रथम) आणि पूजा पांगम (द्वितीय), आणि तिसरा गट पेन्सिल/पेन स्केच/चारकोलमध्ये शर्मन मान (प्रथम) आणि शुभांगी देसाई (द्वितीय). परिक्षक म्हणून सुरेश लोणकर, राजेश्वरी कार्ले आणि अतुल गेंदले यांनी काम पहिले.
‘आकृती’ या नावाने चित्र प्रदर्शन भरविले जाते. ‘आकृती’ हा १७ वर्षां पूर्वी स्थापना झालेला महिला चित्रकार असलेला ग्रुप आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून इथे महिला सहभागी होतात. गेले ४ वर्षे हैदराबाद, वाराणसी, दिल्ली, इंदोर व अमेरिका इथूनही चित्रकार महिला सहभागी आहेत.
पुण्यातील नावाजलेले व नॅशनल अवार्ड विजेता तरुण कलाकार प्रेम आवळे यांनी तैल व्यक्तीचित्राचे, त्याचप्रमाणे प्रसिद्ध कलाकार अतुल गेंदले यांनी लँडस्केपचे व चंद्रकांत शिंदे यांनी पेन्सिल स्केचचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी होती.