पुणे-गांधी कुटूंबियांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
गृहमंत्री अमीत शहा हे जबाबदार राहतील. केंद्र सरकारने गांधी कुटूंबियांना पुन्हा एस.पी.जी. संरक्षण
द्यावे अन्यथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा पुणे
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.
बागवे यांनी या पत्रकात असेही म्हटले आहे कि,सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना
असणारे एस. पी. जी. चे संरक्षण काढूनघेण्याचा निर्णय केंद्रिय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांचे दहशतवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर गांधी कुटूंबातील
व्यक्तींना एस.पी.जी. संरक्षणदेण्यात आले होते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना एस.
पी.जी. चे संरक्षण देण्यात आले होते. मोदी सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केलेला आहे.
माजीपंतप्रधान स्व. व्ही.पी.सिंग यांनी स्व. राजीव गांधी यांची एस.पी.जी. सुरक्षा काढून घेतली होती.
त्यानंतर दोन वर्षातच राजीव गांधी यांची हत्या झाली. गांधी परिवार देशातील करोडो लोकांचे व
काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेरणा स्थान आहे. गांधी कुटूंबियांनी देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची
आहुती दिली. गांधी कुटूंबियांचे एस.पी.जी. संरक्षण काढून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने सूडबुध्दीने
घेतलेला आहे. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी कुटूंबियांची एस. पी. जी. सुरक्षा
चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या राजवटीत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी
यांना एस.पी.जी. ची सुरक्षा चालू ठेवली होती. मोदी सरकारच्या राज्यात काही सामाजिक संघटनेच्या
प्रमुखांना कारण नसताना झेड प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे. केवळ त्या संघटना भारतीय
जनता पक्षाशी निगडीत आहेत म्हणून त्यांच्या प्रमुखांना झेड प्लसची सुरक्षा देण्यात आली आहे.