पुणे- शहरात सध्या रस्ते खोदाईमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही रस्ते खोदाईची कामें सत्ताधारी भाजप व प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच का केली नाहीत. जर कामे पूर्ण होणार नव्हती तर खोदाईची परवानगी का देण्यात आली होती. यावरून स्पष्ट होते की, शहर खड्ड्यात असताना सत्ताधारी भाजप धुंदीत आहे व प्रशासनाचेही या सगळीकडे दुर्लक्ष झालेले आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.
बागूल म्हणाले की, सध्या लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता हे मुख्य रस्ते आणि गल्ली बोळातील विविध ठिकाणी रस्त्यांची कामें महापालिकेने हाती घेतली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोविड साथीमुळे नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध आहेत. त्याकारणाने दुपारपर्यंत कामे उरकण्यासाठी लोकांची धांदल उडते, गर्दी होते आणि त्यातच रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीची कोंडी होते. पावसाळा येऊन ठेपला तरी रस्त्याची कामे चालूच आहेत. पथ विभागाला जबाबदार अधिकारी कोणी आहे की नाही? आणि पालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे शहरातील या स्थितीकडे लक्ष आहे की नाही? त्यात एल अँड टीने पाण्याची लाईन टाकण्यासाठी विविध ठिकाणी खोदाई सुरु केली आहे त्यांना कोट्यावधी रुपये पुनर्रडांबरीकरण व खोदाई केलेले खड्डे बुजवण्यासाठी त्यांच्या एस्टीमेटमध्ये असून देखील एक किंवा अर्ध्या मीटरचाच रस्ता त्यांच्याद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे.
आता लॉक डाउन संपला असून लोकं बाहेर पडत आहेत. शहारत वाहतूक कोंडी वाढत आहे. याकडे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष देऊन पुणेकरांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल या अगोदरही आयुक्तांना लेखी व तोंडी स्वरूपात याबाबत कळवण्यात आले आहे. आता आंदोलन करण्याची वेळ आली असून आंदोलन हा शब्द देखील बोथट झाला आहे, असे वाटते असे आबा बागुल म्हणाले.
बागूल म्हणाले की, शहराकडे दूर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुणेकर नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील परंतु आपल्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ५६ क प्रमाणे कारवाई केली तरच अधिकारी आपली जबाबदारी ठामपणे पार पडतील. त्याशिवाय ते जागे होणार नाही. शहरातील खड्डे युक्त स्थिती पाहण्यासाठी आपण आम्हाला वेळ देऊन सर्व शहर फिरावे व शहर खड्डे मुक्त करून पुणेकरांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले असल्याचे आबा बागूल म्हणाले.