पुणे- पुण्यातील मेट्रो चे श्रेय घेण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असताना आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ,’ पृथ्विराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पुणे मेट्रोचा पाया रोवला, या देशात सुई पासून रॉकेट निर्मितीमध्ये कॉंग्रेसची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे असे सांगत पुण्यातील भाजपा सह मेट्रोचे श्रेय घेणाऱ्यांना टोला लगाविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकेल असाही विश्वास व्यक्त केला आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नाना पटोले यांनी सारस बागेसमोरील अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी मंत्री विश्वजित कदम ,चंद्रकांत हंडोरे , शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,महापालिकेतील गटनेते आबा बागुल ,मोहन जोशी,अरविंद शिंदे , कमल व्यवहारे,भीमराव पाटोळे,अजित दरेकर ,अविनाश बागवे, अमित बागुल, हेमंत बागुल,सतीश पवार ,अभय छाजेड,संजय बालगुडे,रमेश अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले ,’ पुणे कॉंग्रेसच्या वतीने नेते आबा बागुल यांच्या माध्यमातून ८० मुलांची टीम साफसफाई साठी आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी जात आहे . पण हि मदत आहे याचा गाजावाजा केला जात नाही. सेवा हा कॉंग्रेसचा धर्म आहे .तो आम्ही पाळतो आहे.
अति वृष्टी आणि पुराने महाराष्ट्रावर जे संकट उभे राहिले त्यामुळे अनेकांची कुटुंबे उधवस्त झाली .त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे सरकारसह सर्वांची जबाबदारी आहे हि वेळ राजकारणाची नाही सेवेची आहे हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आहे. भाजपकडून मात्र सातत्याने याबाबत राजकारण केले जाते आहे. समुद्रामध्ये वादळ आले होते त्यात केरळ पासून ते गुजरात पर्यंत नुकसान झाले. पंतप्रधानांनी तेव्हा गुजरात चा हवाई दौरा करून गुजरातला १ हजार कोटीची मदत जाहीर केली .महाराष्ट्राला मात्र काहीही दिले नाही . केंद्राकडून आता अपेक्षा करणे गैर झाले आहे. राज्याचे जीएसटी आणि अन्य कर यातून १ लाख कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणे आहे तेही सरकार देत नाही .तरीही राज्याचा गाडा चालवून येथील महाविकास आघाडी सरकार राज्याच्या जनतेला मदत करण्याचे काम करत आहे. त्यांच्यावर आरोप न करता येथील जनतेला कसे सांभाळून पुढे जाता येईल त्यास आमचे प्राधान्य आहे.
कोल्हापुरात मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे एकमेकांसमोर कसे आले या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले ,’ मी यापूर्वीच सांगितले तो योगायोग होता,जासुसी करण्याचे काम कॉंग्रेसचे वा आमचे नाही ,ते भाजपच्या केंद्र सरकारचे आहे ,त्यांनी लोकांची प्रायव्हेसी संपविली .लोकसभेतही सरकार बोलायला तयार नाही. कोण कोणाला केव्हा भेटले कशाला भेटले याची जासुसी करणे आमचे काम नाही लोकांना मदत करणे आमचे काम आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हापासूनच पुण्यातील मेट्रोच्या कामाचा प्रारंभ झाला हे विसरता कामा नये. तेव्हाच पाया येथे रोवला गेला . श्रेयवाद कोणी घ्यायचा हा विषय त्यांचा आहे .देशात सुई पासून रॉकेट बनविण्याचे काम कॉंग्रेस पक्षाने केलेले आहे. देशाला महासत्ता बनविण्याचे काम कॉंग्रेसने केलेले आहे. .पण यात ‘आम्ही केले , आम्ही केले ..असे म्हणण्याचे काम करावे असे आम्हाला वाटत नाही. ज्यां लोकांनी या ७ वर्षात देशाला मागे नेण्याचे काम केले तीच लोकं ,हे आम्ही केले म्हणत असतील तर त्यांचे त्यांना लखलाभ होवोत .अण्णाभाऊ साठेंचा प्रवाह अजूनही उपेक्षित आहे त्याला प्रवाहात आण्याचा प्रयत्न आमचा अजूनही सुरु आहेच , अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे पाठविण्यात येतो आहे. मीच अध्यक्ष असताना हा प्रस्ताव मांडला होता .मातंग समाजाला आरक्षण लाभ अजुनही मिळालेली नाही हि वस्तुस्थिती आहे . कॉंग्रेस मातंग समाजाच्या मागे राहील. आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकेल असाही दावा त्यांनी केला . कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले म्हणाले,’ अण्णाभाऊंच्या साहित्याचे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे. सामाजिक आणि दमनकारी व्यवस्थे विरोधात दिलेले विचार ,साहित्य आजही प्रेरणादायी आहेत. केंद्रात बसलेल्या दमनकारी सरकार विरोधात ते प्रेरणा देईल .
सारसबाग येथे तीन ट्रक भरून पूरग्रस्तांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यासाठी रवाना होत असलेल्या ट्रकला नाना पटोले यांनी हिरवा झेंडा दाखवला त्याप्रसंगी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम,पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार मोहन जोशी,नगरसेवक अविनाश बागवे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आबा बागुल म्हणाले की, नैसर्गिक अपत्तीवेळी मदतीला धावून जाणं यात आम्ही सदैव पुढाकार घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी देखील सांगली कोल्हापूर भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हाही मोठी मदत केली होती. आताही करत आहोत आता ही मदत गोळा करून जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे न देता आम्ही थेट नागरिकांना वाटणार आहोत त्यामुळे ती सत्वर मदत मिळेल. तसेच नैसर्गिक आपत्ती आली की मदतीला धावून जाणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याच बरोबर अति मुसळधार पाऊस पडणं त्यातून नद्यांना पूर येणं त्यातून मोठी वित्तहानी होणं आणि नागरिकांना जीव गमवावा लागणं हे वर्षानुवर्षे चालू आहे. हे रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून अनेक तज्ज्ञ टाऊन प्लॅंनर यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागांचे सर्वेक्षण करून पुन्हा असा मोठा पाऊस झाला तर निर्माण होणाऱ्या परिस्थितून पूर येऊ नये जरी पूर आला तरी गावांचे,शहरांचे,नागरिकांचे नुकसान होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक काही उपाययोजना करता येईल याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचा आम्ही संकल्प केला असून लवकरच त्याचे काम सुरू होत असून महाराष्ट्र शासनाला त्याचा अहवाल सादर करणार आहोत. अश्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामुळे यापुढे अश्या आपत्तीतून होणारे नुकसान टळेल असे आबा बागुल म्हणाले.
हे मदत कार्य सांगलीतील शिरोळ,आलास, बुबनाळ,कुरुंदवाड येथे तीन दिवसांत थेट वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये 2000 रेशन किट (साखर,चहापत्ती, मीठ,हळद,लाल तिखट,तांदूळ, साबण,डाळ), 1000 ब्लॅंकेट,2000 सोलापूरच्या भाकरी व चटणी,1000 साड्या,3000 मास्क,1000 सॅनित्यझेर आदी साहित्य आहे. सोबत सुमारे 50 कार्यकर्ते असून हे कार्यकर्ते मदत वाटपात सहभागी होणार आहेत शिवाय तेथील गावकऱ्यांवरती ताण येऊ नये यासाठी हे कार्यकर्ते स्वतःचे जेवण स्वतःच बनवणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही जबाबदारी पडू नये याची खबरदारी देखील त्यांनी घेतली आहे. याचा बरोबर सोबत झाडू,फावडे,घमेली आदी साहित्य सोबत घेतले असून पूरग्रस्त भागांतील कचरा गाळ काढण्यात येणार असून स्वच्छता करण्याचे कामही हे कार्यकर्ते करणार आहेत. तीन दिवसांच्या या मदत वाटप कार्यक्रमात पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांच्यासह हेमंत बागूल,महेश ढवळे, सागर आरोळे,धनंजय कांबळे,बाबासाहेब पोळके, इम्तियाज तांबोळी,अभिषेक बागूल या प्रमुख कार्यकर्त्यांसह 50 कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले .