पुणे- रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या पुणे शहराअंतर्गत ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’चा ( एचसीएमटीआर) प्रकल्प अंतिम टप्प्यात येऊनही आजमितीस अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी गेली १८ वर्षे पाठपुरावा करणारे काँग्रेसचे पालिकेतील माजी गटनेते आबा बागुल यांनी जीवघेण्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीच एचसीएमटीआर रस्त्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेसचे पुणे महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल यांनी म्हटले आहे की, या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’मुळे (एचसीएमटीआर रस्ता) पुण्यातील जीवघेण्या वाहतुकीचा प्रश्न सुटून पुणेकरांना दिलासा मिळण्याचा मार्ग सहज सुकर असतानाही गेल्या 35 वर्षांपासून एचसीएमटीआर रस्त्याचा प्रस्ताव रखडला आहे. विशेष म्हणजे अंतिम टप्प्यात आलेला हा प्रस्ताव अजूनही मार्गी लागलेला नाही. गेली ३५ वर्षे हा प्रकल्प रखडला असून १८ वर्षांपासून मी हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा जास्त रकमेने आल्यामुळे सदर निविदा रद्द करण्यात आली. परंतु यासाठी फेर निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. तदनंतर कोणत्याही हालचाली निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी झाल्या नाहीत व हा प्रकल्प प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडला गेला,ही खेदजनक बाब आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आपण या प्रकल्पाकडे वैयक्तिक लक्ष घालावे. जेणेकरून पुण्याच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल. हा रस्ता ३७ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रुंदीचा आहे. जुन्या पुण्याच्या ११० स्क्वेअर किमी हद्दीचा हा रस्ता असून त्यावेळी पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजने १९८० साली सादर केला होता व तो १९८७ च्या विकास आराखड्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. परंतु आजपर्यंत हा रस्ता अस्तित्वात आलेला नाही. हा रस्ता पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून काही स्वार्थी विकसकामुळे व दरवेळी त्यात अदलाबदल केल्यामुळे, त्या विकसकांना ‘फेव्हर’ केले जात आहे. अशा पुणेकरांच्या भावना झाल्या आहेत. हा रस्ता आपण लवकरात लवकर मार्गी लावावा व त्याबाबत तात्काळ आदेश आपण महापालिका आयुक्तांना द्यावेत . मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील हा वाहतुकीच्या व पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला एचसीएमटीआर रस्ता आपल्या काळात मार्गी लागून पुण्याच्या जीवघेण्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होईल हीच पुणेकरांची अपेक्षा असल्याचेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.