पुणे- पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा प्रकल्प आणू म्हणणे म्हणजे ,म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं आहे,गेलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी टोलेबाजी केली. वेदांता-फॉक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेला. तर आता चर्चा कशाला. केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी झालं ते झालं आता नवीन काय करता येईल असा विचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. मात्र त्याचवेळी त्यांनी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला दोष देणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांचा खोचक शब्दांमध्ये समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र नेहमी गुंतवणूकदार यांच्या पसंतीचे देशातील पाहिले राज्य राहिलेले आहे. तशाप्रकारे नेतृत्व राज्यात त्यावेळी होते. परंतु सध्याचे राज्याचे नेतृत्व आम्हाला गरज नाही अशाप्रकारचे दिसते आहे. भांडवली गुंतवणुकीस योग्य वातावरण अतापर्यंत देशात महाराष्ट्राने निर्माण केले आहे. ‘काय झाडी, काय हवा’ हे रोज म्हणण्यापेक्षा आणि वाद घालण्यापेक्षा राज्याच्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्रित येऊन विकासावर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन नवीन गुंतवणूक प्रकल्प राज्यात आणले पाहिजे.
पवार म्हणाले, वेदांत प्रकल्प हा महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये गेला आहे. तळेगाव येथे हा प्रकल्प येणार होता. त्यानुसार राज्य सरकारने आवश्यक ती तयारी केली होती. हा प्रकल्प दुसरीकडे जायला नको होता. त्यामुळे आता चर्चा करून उपयोग नाही. कारण तो पुन्हा राज्यात प्रकल्प येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत होते. त्यामुळे त्यांनी केवळ आरोप करू नये. कंपनीने दुसरा प्रकल्प देवू असे सांगितले हे केवळ समजूत काढण्याचा प्रकार आहे.
पवार म्हणाले, केंद्राची सत्ता हातात असल्याने अशाप्रकारे निर्णय होतात. मोदी आणि शाह हे केंद्रांत सत्तेत असून त्यांचे सर्वात जास्त दौरे गुजरातमध्येच असतात. तळेगावच्या आजूबाजूला चाकण , रांजणगाव औद्योगिक परिसर असून त्याला ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. इथे प्रकल्प टाकला असता, तर वेदांत कंपनीला ही चांगले झाले असते.
पवार म्हणाले, कंपनीला आपली कंपनी कुठे चालवायची हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारे कंपनीने भूमिका घेतली असून त्यात नवीन काही वाटत नाही. आमच्या काळात एनरोन प्रकल्पास विरोध झाला आणि राज्य सरकारला तो प्रकल्प गुंडाळावा लागला होता. नवीन सरकार राज्यात आले परंतु त्याचा कारभार दिसून आला नाही.