पुणे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम आणि कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत विविध प्रश्न विचारत माहिती घेतली आणि त्यांनी आढावाही घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पदाधिकारी आणि महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळात आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना केल्या असून जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना उपचारांबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असेही त्यांनी सांगितले
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेने शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून कोविड काळात उत्तम काम केले आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांनी अशी योजना राबवावी. ‘जंम्बो’ कोविड सेंटर उभारुन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या. महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधक लसीबाबत प्रभावी जनजागृती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्या अर्थसंकल्पातून मदत केली याबाबत राज्यमंत्री डॉ. पवार यांनी महापालिकेचं अभिनंदन केले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी सुरक्षितेतच्या चाचण्या सध्या सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.”पुणे जिल्ह्याने आतापर्यंत एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. येथील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जात असून त्यांच्या लसीकरण चाचण्या सुरू आहेत. आता जरी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी महापालिकेकडून जनजागृती प्रभावीपणे राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 220 कोटींचा निधी आलेला आहे असेही पवार यावेळी म्हणाल्या आहेत.’