पुणे -भाजपच्या भ्रष्ट आणि श्रेयवादाच्या कारभारात अडकल्यानेच कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रकल्प रखडला आहे. भूसंपादनासाठी प्रकल्पग्रस्तांचे समाधान करता येईल असा तोडगा असूनही महापालिकेच्या सत्ताधारी
भाजपने तो अंगिकारला नाही त्याचा परिणाम या रस्त्याचे रुंदीकरण रखडण्यात झाला असा स्पष्ट आरोप आज येथे राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला आहे. जे कोरोनाच्या महामारी च्या काळात घरात दडून बसले ते सुगंधी कट्ट्यावर बसून आता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाने नाट्य घडवून श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू पाहत आहे असाही आरोप त्यांनी केला आहे.
पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या कात्रज व कोंढवा या महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा रस्ता म्हणजे कात्रज-कोंढवा रोड होय..येथे नित्याची वाहतूक कोंडी, अपघातांच्या मालिकेत निष्पाप नागरिकांचे गेलेले बळी,पुणे शहरातील महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून मान्यता. आणि त्यासाठी सहावेळा राबवावी लागलेली निविदा, आणि ती का राबवावी लागली, त्यात वेळ कसा घालविला गेला यातून श्रेयवाद व भ्रष्ट्राचाराचे झालेले आरोप अशा विविध विषयांनी शहराच्या राजकीय पटलावर कात्रज कोंढवा रस्त्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेकवेळा पुर्वगणनपत्रक फुगवून ज्यादा दाराच्या निविदा मान्य करायचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला . आणि या रस्त्याच्या अनुषंगाने होऊ पाहणाऱ्या भ्रष्टाचारास खुलेआम आव्हान दिले. या आव्हान प्रती आव्हाना नंतर आता या रस्त्याचे काम सुरु आहे . पण सध्या या रस्त्याचे काम भूसंपादन अभावी संथ गतीने सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने याला जोरदार हरकत घेण्याची भूमिका घेतली आहे.केवळ ४३ रहिवासी बाधित उरले आहेत ज्यांना महापालिका जवळच नवी पर्यायी घरे देऊ शकते तरीही त्याबाबत महापालिकेतील सत्ताधारी आणि स्थानिक भाजपा नेते हा प्रश्न भिजत ठेवीत आहेत .सत्तेत चार वर्षे भाजपा असताना भूसंपादन, अतिक्रमण काढणे तसेच ठेकेदार व प्रशासनाला योग्य आदेश देऊन काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते.पण ‘नाचता येईना अंगण वाकडे..’असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीने केला आहे.या प्रकरणात प्रकल्प बाधित व स्थानिक नागरिक यांची भूमिका सुद्धा स्पष्ट आहे .पण काही राजकारणी त्यांनाही विचलित करीत असल्याचा आरोप होतो आहे.रस्ता रुंदीकरणात बाधित रहिवासी असलेल्या कुटुंबांची मागणी मान्य करणे महापालिकेला फार काही अवघड नाही पण २५ वर्षांहून अधिक काळ येथे असलेल्या व्यावसायिकांना मात्र रोख मोबदला हवा आहे. रस्ता रुंदीकरणाच्या जागेत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांच्या मागणीला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सामोरे जायचे आहे. आणि महापालिकेची निवडणूक देखील वर्षाने होऊ घातली आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कात्रज कोंढवा रस्त्यावर जाऊन काही माध्यमांनी केलेला हा व्हिडीओ रिपोर्ट