सावरकरांच्या घरातील वीरांगनांच्या शौर्यगाथेने भारावले पुणेकर !
पुणे :स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयींच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या ‘त्या तिघी’ या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी… स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री प्रयोगाला बुधवारी सायंकाळी पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्रांतिकार्यात हालअपेष्टा सोसणाऱ्या, तरीही हार न मानता राष्ट्राचा संसार पुढे नेणाऱ्या या वीरांगनांची शौर्यगाथा पाहताना पुणेकर रसिक भारावून गेले! ‘अभिव्यक्त पुणे’ संस्थेतर्फे १ मे, महाराष्ट्र दिनी सुदर्शन रंगमंच येथे हा एकपात्री प्रयोग सादर झाला.
प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, लेखिका डॉ. शुभा साठे, श्रेयसचे दत्ता चितळे हे मान्यवर उपस्थित होते. प्रयोगाची संकल्पना, संहिता लेखन अपर्णा चोथे यांचे असून सावरकर घराण्यातील सौ. यशोदाबाई गणेश सावरकर, सौ. यमुनाबाई विनायक सावरकर व सौ. शांताबाई नारायण सावरकर या तीनही व्यक्तिरेखा त्यानी समरसून साकारल्या आणि तो रोमांचक काळच रसिकांसमोर उभा केला.
दिग्दर्शन अजिंक्य भोसले यांचे असून संगीत अजित विसपुते यांनी केले आहे. नेपथ्य आणि वेशभूषा अश्विनी चोथे-जोशी यांचे असून प्रकाशयोजना संकेत पारखे, स्थिरचित्रण चैतन्य कुलकर्णी यांनी केले आहे.
सावरकर बंधूंचा त्याग, पराक्रम, कष्ट इतिहासात नोंदवला गेला आहे. पण हा त्याग, पराक्रम करत असताना त्यांच्या घरातील स्त्रिया कशा जगल्या? कष्टभरली आयुष्य अनेकींच्या वाट्याला येतात, पण आनंदी आणि रसाळ मन, उदात्त विचार आणि दुःखाचं हलाहल पिऊनही न ढळणारी देशनिष्ठा हे त्यांचे विशेष गुण त्यांना अढळपदी नेऊन बसवतात. अशा, आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा निष्ठेने सांभाळणार्या वीरांगनांची शौर्यगाथा या एकपात्री प्रयोगाद्वारे रंगमंचावर आली.
यावेळी डॉ.सतीश देसाई यांच्या हस्ते कलाकार आणि तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.
‘सावरकर घराण्यातील प्रत्येकाचा त्याग अतुलनीय असून या प्रयोगाद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे मांडला गेला आहे. युवा पिढीने हा प्रयोग जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी’ असे आवाहन डॉ.सतीश देसाई यांनी यावेळी बोलताना केले.