पुणे : गरीबी असली तरी उच्च शिक्षण घेण्यामध्ये ती अडसर कधीच नसते. इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच मिळतो. सकारात्मकता, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची सवय विद्यार्थ्यांना हवी. मनाने आणि शरीराने सक्षम झाल्यास यश नक्कीच मिळेल. असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा दिनांक ६ डिसेंबर पर्यंत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वालचंद संचेती, पराग शहा, डॉ. गजानन एकबोटे, माजी आमदार दीपक पायगुडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे सहायक जनरल मॅनेजर सतीश कुंभार आणि अतुल जोशी, महाराष्ट्र एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी, पुरुषोत्तम लोहिया, आदित्य लोहिया, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून मुकुंद दास लोहिया १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती योजना १ जून २०२३ पासून सुरू होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या प्रश्नसंचाचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सुलभा विधाते, डॉ. जयश्री अत्रे, सुवर्णा कऱ्हाडकर, अर्चीता मडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वालचंद संचेती म्हणाले, जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हल्लीच्या शिक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत परंतु चांगला अभ्यास करून जीवनामध्ये यशस्वी होणे हे महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानाला महत्त्व आहे, त्याचबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. तर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्या सहयोगाने श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते ६ यावेळेत होणार आहे. याशिवाय सायंकाळी आयोजित सप्तस्वरोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सांस्कृतिक व सांगितिक कार्यक्रम होतील. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.