उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षरसेवा पुरस्कारांचे वितरण
पुणे : आयुष्यात वेगळे काहीतरी करण्याची प्रेरणा पुस्तक वाचनातूनच मिळाली.पुस्तक वाचनातून निर्माण होणारे मन आणि संवाद स्वत:तील कार्यक्षतमा वाढविण्यास उपयुक्त ठरते. बालसाहित्याकडे दुर्लक्ष झाले हे वास्तव आहे, पण काही मंडळी सध्या या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. सकस साहित्याच्या माध्यमातून बालमनावर चांगले परिणाम घडविण्याची जबाबदारी बालसाहित्याची निर्मिती करणार्यांवरच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले. राजकारणातील दलबदलुंवर सगळे राजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटीतांचा आसरा, रोज नवा जावई इथे रोज नवा सासरा अशा शब्दांत फुटाणे यांनी मार्मिक टिप्पणी करताच उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.
मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणार्या संस्थांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार रामदास फुटाणे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर होते. मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिरसाट यांच्या वतीने गोपाळ नेवे, टिळक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे तर जोगळेकर यांच्या वतीने ज्योती जोशी व स्नेहल मसालिया यांनी पुरकार स्वीकारला.
पुण्यातील बालवाचनालय चालविणार्या संस्थांना या निमित्ताने पुस्तके (अक्षरभेट) भेट देण्यात आली. यात प्रसाद भडसावळे, निरजा जोशी, नरहरी पाटील यांचा समावेश होता.
या वेळी बोलताना रामदास फुटाणे यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबविल्याबद्दल सुरुवातीस आयोजकांचे आभार मानले आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कौतुकही केले. राजकारण, समाजकारणावर हलक्याफुलक्या शब्दांत फटकारे ओढत त्यांनी वास्तव चित्र उभे केले. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना, पूर्वाश्रमीचे आयुष्य सर्वांनाच मान्य होतं, दिल्लीच्या सामूहिक विवाहात घटस्फोटीतांना प्राधान्य होतं अशा मिश्किल स्वरुपात टिप्पणी केली. कुठलाही राजकीय पक्ष हा विचारांवर अवलंबून नसतो तर त्या त्या परिस्थितीवर निर्णय घेत असतो, यावर भाष्य करताना सगळेच झाले अस्थिर रोज बदलती रंग, कमळ झाले नोकिया आणि धनुष्य झाला सॅमसंग; दिल्लीचे ऐकूनच जर एकमेकांचे वैरी होतील, हात आणि घड्याळ सुद्धा लवकरच ब्लॅकबेरी होतील. राजकीय आयुष्याचे विदारक चित्र दर्शविणारी दीर्घ कविता त्यांनी ऐकविली.
प्रशांत जगताप यांनी त्यांच्या भाषणात राजकीय क्षेत्रातील यशाबाबत ज्योतिषांना पत्रिका दाखविल्याचा उल्लेख केला होता, हा धागा पकडून तुमच्या पत्रिकेत अजित पवार हा ग्रह असल्यामुळे तुम्हाला अपयश येणार नाही, असे सूचित केले. तर आपल्या पत्रिकेत शरद पवार नामक ग्रह होता त्यामुळे आपला राजकीय क्षेत्रात प्रवेश झाल्याची आठवण फुटाणे यांनी या प्रसंगी सांगितली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रशांत जगताप म्हणाले, ज्या वयात मुले वाचन करताना, मैदानावर खेळताना दिसायला पाहिजे त्या वयात ही मुले सोशल मीडियात अडकलेली पाहायला मिळत आहेत. या गोष्टीला आपण सर्वजण जबाबदार आहोत. बालसाहिच्या क्षेत्रात नियतकालिकांच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. पुस्तकेच आयुष्य बदलू शकतात हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरून नमूद केले. बालसाहित्यासाठी वाहून घेतलेल्या नियतकालिकांना शासकीय जाहिराती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले. पुरस्कारार्थींना त्यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बालसाहित्याकडे पूर्वीपासून दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या कष्टाने आणि आर्थिक झळ सोसून काहीजण नियतकालिकांची निर्मिती करीत आहेत. दिवाळी अंकांना शासकीय जाहिराती मिळतात त्याच प्रमाणे बालसाहित्याला वाहून घेतलेल्या नियतकालिकांनाही शासनाच्या आर्थिक मदतीचा हात मिळाला पाहिते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्थिक पाठबळ मिळाल्यास अधिक प्रमाणात दर्जेदार साहित्यनिर्मिती होऊ शकेल असेही त्यांनी नमुद केले.
बालसाहित्यातूनच साहित्य संस्कृतीचा विकास होतो, बालकांच्या हाती साहित्य मिळाले नाही तर मोठ्यांचे साहित्य कुणी वाचणार नाही, असे मत किरण केंद्रे यांनी व्यक्त केले. लॉकडाऊन काळात पुस्तकेच अनेकांचा आधार बनली होती, असे सांगून प्रसाद भडसावळे यांनी महनिय व्यक्तींच्या वाचन संस्कृतीच्या आठवणी सांगत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्रुती पानसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले तर आभार मिलिंद बालवडकर यांनी मानले.