पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या बिरदवडी, आंबेठाण, महाळूगे-इंगळे रस्त्याचे भूमिपूजन
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मधील खेड तालुक्यातील रस्ता पुणे -नाशिक रा. मा.५० (नव्याने घोषित रा. मा. क्र.६०) ते बिरदवाडी आंबेठाण, महाळूगे(चाकण तळेगाव) लांबी ७.०० किमी (ग्रा. मा.११) रस्त्याच्या कामकाजाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रम जि. प. प्राथमिक शाळा आंबेठाण बिरदवडी व पाझर तलाव खोलीकरण कार्यक्रम खेड तालुक्यातील केळगाव येथे पार पडला. केळगाव पाझर तलावाचे भूमीपूजन आळंदी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास मंत्री, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, तथा अन्न औषध प्रशासन, संसदीय कार्ये , पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीए महानगर आयुक्त किरण गित्ते, जि.प.सदस्य श्री शरद आनंदराव बुट्टे पाटील, आळंदी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, पंचायत समिती सदस्य श्री चांगदेव रामचंद्र शिवेकर, सरपंच आंबेठाण श्री गणेश सदाशिव मांडेकर, सरपंच बिरदवाडी सौ मंदा शांताराम लोखंडे, सरपंच महाळुंगे इंगळे सौ कल्पना गौतम कांबळे, उपसरपंच आंबेठाण श्री काळूराम बबन बंडेकर, उपसरपंच बिरदवाडी सौ आशा कांताराम पवार, उपसरपंच महाळुंगे इंगळे श्री योगेश म्हाळुंगकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर रस्त्यामुळे चाकण शहर आणि एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. परिसरातील सहा गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुणे नाशिक महामार्गापासून बिरदवडी-आंबेठाण-महाळूगे इंगळे या तीन गावांना हा रस्ता जातो. यामध्ये ७मी. रुंद डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या विकासासाठी जवळपास 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर जलसंधारनाच्या विकासकामांसाठी ८.५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील गावाकरिता पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बळकटीकरण करणे व जुन्या तलावातील पाणीसाठा वाढविणेसाठी गाळ काढून खोलीकरण करण्याचा पीएमआरडीएचा उद्देश आहे.
पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले की, ‘ग्रामीण भागाला ताकद देण्याचे काम सध्या पीएमआरडीए करत आहे. गावांना घनकचरा व्यवस्थापन, पाणी, वीज अशा समाजव्यापी पायाभूत सोईसुविधा देण्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेतले आहे. ‘
महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले की, ‘पुणे महानगर परिसर विस्तृत आहे. औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायत आणि पीएमआरडीए एकत्र येऊन काम केल्यास गावांचा विकास झपाट्याने होईल. मुख्य रस्त्याची वाहतूक कोंडी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.