पुणे- ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या ११ मार्गावरील तोट्यात असलेले बसमार्ग उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत. असे पीएमपीएमएल ने काल जाहीर करताच आज यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत.गोरगरीबांची मुले शिकावीत असे पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या मार्गांवरील बससेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सोशल माध्यमातून आपला हा संताप त्यांनी व्यक्त करताना म्हटले आहे कि,’
बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. वास्तविक या सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी,छोटे व्यावसायिक व कर्मचारी यांची मोठी सोय झाली आहे.ही जनतेच्या हक्काची बससेवा आहे. ही सेवा बंद झाल्यास या सर्वांचे मोठे हाल होणार असून आम जनतेची ही हक्काची वाहतूक व्यवस्था बंद होणे योग्य नाही. गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटतं की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. केवळ नफा-तोट्याचा विचार करुन ही सेवा बंद पाडणे सर्वथा अनुचित आहे. पीएमपीएमएलच्या प्रशासनाने हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एवढंच नाही राज्य सरकारने देखील यामध्ये लक्ष घालून ही सेवा कायम ठेवणं गरजेचे आहे. माझी पीएमपीएमएलच्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की, कृपया ग्रामीण भागांतील या बससेवा कायम ठेवा. या सेवा पुर्ववत न झाल्यास गोरगरीबांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या प्रवासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात मी स्वतः सहभागी होईन याची कृपया आपण नोंद घ्यावी.