पुणे -शहरात स्थानिक विकास आराखडा (लोकल एरिया प्लॅन), तसेच नगररचना (टीपी स्कीम) योजना राबविण्यासाठीचा संभाव्य आराखडा, त्यातील अडचणी काय आहेत, योजनेचे फायदे काय होणार, याची माहिती देण्यासाठी अहमदाबाद येथील आर्किटेक्ट पद्मश्री डॉ. बिमल पटेल बुधवारी महापालिका सभागृहात सादरीकरण करणार आहेत. नगरसेवक, महापालिकेच्या अभियंत्यांसह याविषयाचे अभ्यासक या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
केंद्र सरकारने अमृत योजनेतर्गंत स्थानिक विकास आराखडा आणि नगर रचना याद्वारे बांधकाम क्षेत्राला चालना देण्याबरोबरच नियोजनबद्ध विकासासाठी या योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभरातील २५ शहरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पुण्याचा समावेश आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात येणाऱ्या तांत्रिक सल्लागारांचा खर्च हा अमृत योजनेच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. पुणे शहरात बालेवाडी (नदीपात्रालगत) आणि महंमदवाडी येथे नगररचना योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांमधून जाणाऱ्या रिंग रोडलगत नगररचना योजना राबविण्यास शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली आहे.
या योजनेसाठी किमान ५० हेक्टर, तर कमाल ५००-६०० हेक्टरपर्यंत क्षेत्राचा विचार करण्यात येतो. सरकारने नव्याने कायद्यात केलेल्या बदलांमुळे ही योजना राबविण्याचा वेग वाढण्यास मदत झाली आहे. कायद्यातील या योजनेची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पुण्यात महंमदवाडी, तसेच बालेवाडी (नदीपात्रालगत) ही योजना राबविणे शक्य असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पटेल अहमदाबाद येथील सीईपीटी विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. शहर नियोजन, इतिहास, जमीन वापर योजना, बांधकाम व्यवसाय, इमारत नियम आणि जमीन व्यवस्थापन यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांना या क्षेत्राशी निगडीत अनेक पुरस्कार मिळाले असून भारत सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. पटेल यांचे नगर रचना विषयावर होणारे सादरीकरण पुण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी प्रतिक्रिया टिळक यांनी व्यक्त केली.