पुणे-
महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा केवळ आकारच न वाढविता तिजोरीत जमा होणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने १२ टक्के करवाढीसह पाणीपट्टीत १५ टक्के वाढ सुचविणारा सहा हजार २२९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी सादर केला. उत्पन्नवाढीसाठी मिळकतकर वसुलीवर भर देतानाच, दंड वसूल करण्यासाठी ‘अॅम्नेस्टी’चे संकेत देत नव्या योजना किंवा प्रकल्पांच्या घोषणेला आयुक्तांनी कात्री लावली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गायकवाड यांनी हा आराखडा समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे सुपूर्त केला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल व शान्तनू गोयल यांच्यासह पालिकेतील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काही नावीन्यपूर्ण संकल्पनांद्वारे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच अर्थसंकल्पीय आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान आयुक्तांनी दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध वर्गीकरणाद्वारे त्याची मोडतोड केली जात असल्याने त्याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारच्या धर्तीवर पुरवणी मागण्यांप्रमाणे एकदाच त्यात बदल करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सादर केला आहे. त्याशिवाय, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मध्यवर्ती भागांमध्ये सोलर/इलेक्ट्रिक बसची कल्पना त्यांनी मांडली आहे. विविध प्रकल्प आणि योजनांवरील वाढता खर्च आणि सातव्या वेतन आयोगामुळे सेवकवर्गासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी मिळकतकरामध्ये १२ टक्के वाढ प्रस्तावित केली गेली आहे. तर, समान पाणीपुरवठ्यासाठी (२४ बाय ७) पुन्हा एकदा पाणीपट्टीत १५ टक्के वाढ सुचविली आहे. पालिकेचा पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी धरणच खरेदी करण्याचा किंवा भागीदारीत घेण्याचा अभिनव प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे.