पुणे : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले असून पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेकांनी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे पॅकिंग करुन पूरग्रस्तांना ते पॅकिंग देण्यात आले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्रह्मनाळ व आसपासच्या गावांतील नागरिकांना ही थेट मदत करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तुंचे पॅकिंग घेऊन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळीच कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले. सहा टेम्पो भरून हा जीवनावश्यक वस्तुंचा माल घेऊन पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडी न आसपासच्या गावांमध्ये या जीवनावश्यक वस्तू थेट पीडित नागरिकांनाच देण्यात आल्या. या पॅकिंगमध्ये तांदूळ, साखर, फरसाण, तेल, मेणबत्ती, चहा पावडर, दूध पावडर, बिस्किटे, काडीपेटी, उपवासाचे पदार्थ, लहान मुलांसाठी खाऊचे पदार्थ, शेंगदाणा चटणी व चपाती, पाण्याच्या बाटल्या या पदार्थांचा समावेश होता. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ही मदत करण्यात आली.
आता पुढच्या टप्प्यात आणखी जादा मदत करण्याचा संकल्प पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आला असून मदत देण्यासाठी सचिन निवंगुणे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, सुनील गेहलोत, भवर चौधरी, दिलीपसिंग राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, रविंद्र सारुक, दादा भेलके, अमित कानिटकर, उमेश बुडमेवार, कन्हैयालाल परिहार आदी 30 पदाधिकारी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात गेले होते, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.