पुणे-कोरोनामुळे गेली २ वर्षे पंढरीची वारी झाली नाही. वारी सुरु झाल्यामुळे अतिशय आनंदात वारकरी या वारीत सामील झाले आहेत. दरवर्षी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्यावतीने वारकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदा वारकऱ्यांचे पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले असून चौरंग पाठ, सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते.
आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली. भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल व आबा बागुल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्ती ही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था व लसीकरणाची व्यवस्था देखील श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचे आबा बागुल यांनी सांगितले.
आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत. कोरोनामुळे पहिल्यांदा या वारीत खंड पडला होता. आता वारी पुन्हा सुरु झाली आहे. पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या वैष्णवांचे यंदा पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले असून पुन्हा असे संकट जगावर येऊ नये यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल शेवटी म्हणाले.
यावेळी जयश्रीताई बागुल, नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय उत्तम वीर, महेश ढवळे,सागर बागुल,सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, वासिम शेख,समीर शिंदे, संतोष पवार,भरत तेलंग,संतोष गंगावणे, योगेश खटावकर,योगेश निकाळजे व कार्यकर्ते उपस्थित होते.