पुणे : प्रतिनिधी
मनमिळाऊ आणि समजूतदार जोडीदाराला प्रथम पसंती द्यायला हवी. मात्र हल्ली ते होताना दिसत नाही. जोडीदार निवडीत अनेक गोष्टींचा उहापोह केला जातो. अपेक्षेप्रमाणे न झाल्यास पुन्हा लग्न होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जोडीदाराची निवड करताना अवाढव्य अपेक्षांचे ओझे ठेऊ नका, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
कात्रज गोकुळनगर येथील संत श्री गुरू रविदास महाराज मंदिर येथे चर्मकार वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. श्री संत रोहिदास समाज विकास संस्था, धनकवडी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, निवृत्त पोलीस अधिकारी विलास गवळी,माजी सनदी अधिकारी विलास चव्हाण, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे सोमनाथ शिंदे, संत रोहिदास दिंडी नंबर 24 आळंदी पंढरपूर अध्यक्ष सुरेश सोनवणे, संत रोहिदास विकास संस्था अध्यक्ष सुखदेव सूर्यवंशी, माजी नगरसेविका लक्ष्मीबाई सातपुते यांचे सुपुत्र अनिल सातपुते, कात्रज तिसऱ्या धाम येथील अमोल वाघमारे, श्रीभाऊ काळे, सामजिक कार्यकर्ते राजकुमार लांडगे,चंद्रकांत कांबळे,अशोल कांबळे, रमेश आगवणे विकास सोनावणे ,संतोष पाचारणे, नंदकुमार सोनवणे, आदीसह संत रोहिदास समाज विकास संस्थाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, चर्मकार समाज हा शांतताप्रिय समाज आहे. श्री संत रोहिदास महाराज यांनी समाजापुढे शांतताप्रिय मार्गाचा आदर्श निर्माण करून दिला आहे. रोहिदास महाराजांच्या दिलेल्या मार्गावर युवक आणि युवकांनी चालायला हवे. तरच समाजाची उन्नती होणार आहे. वधू वर सूचक मेळावे आयोजन करून समाज एकसंध ठेवला जातो. जोडीदार निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जाते. तरुण आणि तरुणांनी किमान अपेक्षा ठेऊन आपला हक्काचा साथीदार निवडल्यास आयुष्य सुंदर होईल, असे बाबा कांबळे म्हणाले,
अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे मोठे अधिकारी व्हावे यासाठी त्यांना योग्य ते व्यासपीठ निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत त्यांना योग्य ते सहकार्य पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल,
यावेळी सुखदेव सूर्यवंशी म्हणाले समाजातील वधू-वरांना योग्य व मनपसंतीचे स्थळ मिळावे यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून विविध भागांमध्ये वधु वर मेळाव्याचे आम्ही आयोजन करतो यातून अनेकांचे संसार उभे राहिले असून अनेकांना योग्य असे जोडीदार मिळाले आहेत आमच्या संस्थेमुळे ज्यांचे लग्न जुळले ते आज आवर्जून आम्हाला भेटतात आणि तुमच्यामुळे आमचा संसार व्यवस्थित सुरू आहे आम्ही सात जन्माच्या बंधनामध्ये बांधले गेलो असे जेव्हा सांगतात त्यावेळेस त्या सर्व कामाचे फलित झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटतं,