पुणे, दि. २७ – मानव निसर्गावर लोभरूपी अणुबॉम्ब टाकत आहे. त्यामुळे निसर्गाचे नुकसान होणार नाही, पण दुष्काळ, महापूर, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीतून आपले नुकसान होणार आहे. आठ दिवसांपूर्वी चीनमध्ये राष्ट्रीय दुष्काळ जाहीर करण्यात आला. फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये ही दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अन्न आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. युक्रेनमधील युद्धामुळे सात दशलक्ष (मिलियन) नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, तर नैसर्गिक आपत्तींमुळे आठ अब्ज (बिलियन) नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येऊ शकते. या संकटावर मात करण्यासाठी ‘कार्बन न्यूट्रल परिसर’ हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा पर्यावरण गट, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग आणि पर्यावरण शास्त्र विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल आणि इलेक्ट्रिक वाहन रॅलीचे उद्घाटन करताना डॉ. शेंडे बोलत होते. प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे श्रीनिवास चव्हाण, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, उपप्राचार्य प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. संतोष फरांदे, डॉ. सोनालिका पवार, डॉ. समीर तेरदाळकर, प्रा. शिवाजी कोकाटे, प्रा. प्रीती आफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शेंडे पुढे म्हणाले, ‘‘जलद विकास, ई वाहने, मोबाईलवर उबेरची सुविधा म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे, शाश्वत विकासाच्या मूल्यमापनाची जबाबदारी आणि पुनर्वापर आदींचे स्मार्ट सिटीत महत्त्व असून, कार्बन न्यूट्रलिटी हा अविभाज्य भाग आहे.’’
डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘उद्याच्या पिढीचा विचार करून आज आपल्याला निसर्ग संरक्षणाचे काम करणे आवश्यक आहे. हे काम एका दिवसापुरते मर्यादित नसून ते दररोज सातत्याने केले पाहिजे. फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर पुनर्वापर न होणार्या प्लास्टिकपासून मुक्त झाला आहे. महाविद्यालयाच्या 66 एकर जागेवर आगामी काही महिन्यांत कार्बन न्यूट्रल परिसराचे लक्ष्य पूर्ण करणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आज शपथ घेतली.’’