पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांना अत्याधुनिक स्वरूप देऊन तेथे भव्य कॉरिडॉर निर्मितीचे कार्य जोरात सुरू आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राला कॉरिडॉर बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी भावना समस्त वारकर्यांनी भक्त पुंडलिक घाटावर केली आहे. तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही तीरांवर संतांच्या नावाने १८ घाटांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे.विश्व शांती केंद्र (आळंदी) माईर्स एमआयटी पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने पवित्र चंद्रभागेची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर ह.भ.प. श्री. महादेव रामचंद्र महाराज यादव हस्ते आरती संपन्न झाली.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, ह.भ.प. रामचंद्र महाराज यादव, बंगलोर येथील कृष्णा महाराज आमले, प्रा.डॉ. टी.एन.मोरे, दत्तात्रय बडवे, डॉ. महेश थोरवे हे उपस्थित होते.
या प्रसंगी रामचंद्र महाराज यादव लिखित श्री गुरू साखरे सांप्रदायिक विचार सागर या ग्रंथाचे प्रकाशन प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, स्वप्न व संकल्प असेल तर कोणतेही कार्य पूर्णत्वास नेता येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर पुल ते गोपाळ पूरापर्यंत १८ अध्याय व १८ संतांच्या नावाने घाटांची उभारणी करावे असे निवेदन समस्त वारकर्यांच्या कडून करतो. ज्ञान तीर्थ क्षेत्र आळंदी ते ज्ञान पंढरीच्या मार्गाने देव भूमीपर्यंत प्रवास करतांना बद्रिनाथ येथील माणा गावात माता सरस्वती मंदिराची निर्मिती करून जगासमोर भारताचे खरे स्वरूप मांडले आहे.
रामचंद्र महाराज यादव म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून सुचलेल्या चंद्रभागेच्या आरतीने संपूर्ण जगात विश्वशांतीचा ठसा उमटविला आहे. आळंदीच्या दोन्ही तीरावर उत्तम प्रकारे घाटांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे १४५ फूट उंचीचा गरुड स्तंभ उभारला गेला आहे. त्या माध्यमातून संतश्री ज्ञानेश्वर महाराज व तुकोबांचे नाव उंच स्थानावर पोहचविले आहे. आळंदी-देहूच्या पुणे जवळील लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून जगात माऊली व जगदगुरूंचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या हातून शिक्षणाबरोबरच ज्ञान तीर्थ क्षेत्र ते देव भूमी पर्यंत अद्वितीय असे कार्य घडलेले आहे. आज त्यांच्याच मार्गदर्शनातून पंढरपूरचाही कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.
प्रा.डॉ. टी.एन.मोरे म्हणाले, शिक्षणाबरोबर भारतीय संस्कृती व परंपरा संपूर्ण देशात पोहचविण्याचे कार्य डॉ. कराड करीत आहेत. त्यांनी ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य अतुलनिय आहे. महाराष्ट्रात प्रथमच चंद्रभागेची आरती सुरू करुन आध्यात्मिक भूमित वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. महेश नलावडे यांनी आभार मानले.
नद्यांचे पुनरुज्जीवन मिळणे आवश्यक
केंंद्र सरकारने सुरू केलेली स्वच्छ भारत योजना ही भारतातील एक सर्वात मोठी चळवळ आहे. त्याचप्रकारे आता देशातील नद्यांचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राजवळील नद्या इतक्या स्वच्छ हव्यात, की त्यातील पाणी हे तीर्थ म्हणून प्यावयाची इच्छा व्हावी. सध्या भारतातील सर्व नद्या या प्रदूषित झालेल्या आहेत. या नद्या खराब का होतात हे पाहून त्या कशा पद्धतीने शुद्ध करता येतील, यावर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिद्द आणि उर्जा असेल तर या नद्यांना स्वच्छतेच्या माध्यमातून पवित्र करण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा.