पर्यटकांना सीमेवरील नागरिकांचे जीवन जवळून अनुभवता येणार; सीमेवरील अधिकारी, सैनिकांशी संवाद साधता येणार – संजय नहार यांची माहिती
पुणे: काश्मीरमधील अॅपल टुरिझमच्या यशस्वी प्रयोगानंतर पुण्यातील सामाजिक संस्था सरहद आता जम्मू- काश्मीर, पंजाब, राजस्थान, तसेच ईशान्य भारतातील युवकांना प्रशिक्षण देऊन ‘बॉर्डर टुरिझम’ सुरू करणार आहे. ह्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले, हे युवक अनाथ आणि गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना त्यांच्या भागाच्या विकासासाठी काही करायचे आहे. बॉर्डर टुरिझमच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होतील.
या सर्व उपक्रमात पुण्यातील गणेश मंडळे, शिक्षण संस्था आणि आय टी कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ गावांची निवड करण्यात आली असून त्यात पंजाबमधील पाकिस्तान बॉर्डर तसेच, दोडा जिह्यातील लेहोटा, कुपवारा जिल्ह्यातील दर्दपोरा, कारगिल मधील हुंदरमान, बांदीपोरा मधील आरागाम, बारामुल्ला मधील सोपोर, ईशान्य भारतातील बॉडोलँड (कोक्राझार), उदलगिरी तसेच लेहमधील चीनच्या बॉर्डरवरील गावांचा समावेश आहे. पर्यटकांना सीमेवरील गावांमध्ये नेले जाईल. तेथे त्यांना सीमेवरील नागरिकांचे जीवन व त्यांच्या हालअपेष्टा जवळून अनुभवता येतील. ते म्हणाले की भारत-पाकिस्तान- बांगलादेश- चीन – सीमेवरील भारतीय सैन्यदलातील अधिकारी व सैनिकांशी पर्यटकांना संवाद साधण्याचीही योजना आहे.
या उपक्रमात स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याची तसेच नवीन पर्यटन स्थळे निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे सीमावर्ती भागातील स्थानिक लोकांची नाळ उर्वरित भारताशी जोडता येईल.
काश्मीर मधील तसेच ईशान्य भारतातील सरहद्दीवरील गावांमधील सौंदर्य जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. परंतु स्थानिक लोकांना रोजगार नसल्याने शत्रूला हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. हि काश्मीर मधील अनेक गावांची परिस्थिती आहे. येथील लोकांना विकास आणि शांतता हवी आहे. राष्ट्रभक्ती आणि सीमावर्ती भागाचा विकास व्हावा यासाठी सरहदच्या सहकार्याने बॉर्डर टुरिझम हा उपक्रम राबविणार आहेत, असे वैभव वाघ तसेच आबा बागुल यांनी सांगितले हा उपक्रम १९ जुलै २०२२ पासून सुरु होणार आहे.