पुणे- कामगारांचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या कडून चांगले काम करवून घ्यायचे असेल, महापालिकेचे उत्पन्न देखील वाढवायचे असेल तर कामगारांची पिळवणूक करणारी ठेकेदारी पद्धत बंद करून थेट रोजंदारी पद्धतीने सेवक भारती केली पाहिजे असे मत कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी येथे व्यक्त केले. कामगारांना सुरक्षा आणि विश्वास मिळाला तर महापालिकेचा आणि पर्यायाने शहराचा फायदा होऊ शकेल असे ते म्हणाले.
पी.एम.सी.एम्प्लॉइज युनियन, पुणे महानगरपालिका कामगार युनियन, पुणे मनपा अभियंता संघ व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे कडून विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने वेळोवेळी येत असतात. यास अनुसरून कॉंग्रेस पक्ष कार्यालयात पी.एम.सी.एम्प्लॉइज युनियन, पुणे महानगरपालिका कामगार युनियन, पुणे मनपा अभियंता संघ व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत पुणे मनपा कामगारांच्या प्रश्नाविषयी चर्चा झाली. यामध्ये सर्व संघटनानी सातवा वेतन आयोग, बोनस, कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांचे वारसांना नोकरी, कालबद्ध पदोन्नती लागू करणेबाबत प्रश्न मांडले व विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
सदर बैठकीत आबा बागुल यांनी सर्व संघटनांना आवाहन व विनंती केली कि, पुणे मनपाची जमा बाजू भक्कम केल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. जमा बाजू वाढविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. गेले ५ ते ७ वर्षात ठेकेदारी पद्धतीने कामे करनेची प्रथा मोठ्या प्रमाणात चालू झाली असून महसुली खर्च वाढत वाढत चालला आहे. आपले १८००० सेवक असताना ठेकेदारी सेवक घेतल्याने हा खर्च वाढतोय, परंतु त्यांना कमी वेतन देऊन जास्त काम करून घेतात, सबब ठेकेदारी सेवकांची पिळवणूक चालू असल्याने ते पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. ठेकेदारी सेवक पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे रोजंदारी सेवक घेऊन कामे केल्यास कामे पूर्ण होतील. रोजंदारी सेवक घेतल्यास त्यांचे रेकॉर्ड मनपाकडे असेल. ठेकेदारी सेवक घेण्यात आर्थिक भ्रष्टाचार होत असून मनपाचे नुकसान होत आहे.
मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मनपाच्या ५ ते ६ हजार सदनिका विक्री करणेबाबत विचार विनिमय चालू असून त्यामुळे कायमस्वरूपी उत्पन्न मनपास मिळणार नाही. यापैकी काही सदनिका मनपा सेवकांना ३० वर्षांच्या लीजवर/भाडेतत्वावर अथवा अन्य मार्गाने या सदनिका दिल्यास मनपास कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल. पुणे मनपाच्या सेवकांना घरे देखील राहावयास मिळतील व मनपाचे उत्पन्न देखील वाढेल.
कामगारांचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब रस्त्यावर येते, फंड आणि इतर रक्कम यातून सध्याच्या महागाईच्या काळात कुटुंबास हातभार लागत नाही. कॉंग्रेस पक्ष सर्व सेवकांच्या कुटुंबीयांच्या देखील पाठीशी असून मनपाच्या सर्व सेवकांचा सुरक्षा कवच विमा काढण्याबाबत चर्चा झाली. मार्च २०२० मध्ये आबा बागुलांनी याबाबत स्थायी समितीपुढे ठराव देखील दिलेला होता. पुणे मनपा सेवकांचा अचानक कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास ५० लाख रकमेचा विमा काढल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रक्कम मिळेल. यासाठी आवश्यक प्रीमियम ५० टक्के रक्कम हि मनपा व ५० टक्के रक्कम हि सेवकांकडून घेता येईल अशी चर्चा झाली. तसेच पुणे सिटीझन कार्ड काढनेसाठी व मनपा कर्मचाऱ्यांचे स्मार्ट कार्ड काढणे बाबत गेली ८ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. याबाबत चर्चा होऊन मनपा सेवकांचे स्मार्ट कार्ड लवकरच येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.