पुणे- कात्रज देहूरोड मार्गावरील नवले पूल आणि परिसरात आजवर मोजता येणार नाही असे असंख्य विचित्र अपघात झाले असून सातत्याने सुरु असलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी काही करावे असे मात्र कोणत्याही पोलीस, महापालिका वा राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला अगर लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवक, आमदार वा खासदाराला वाटेना ..त्यांना जाग येईना असे चित्र असताना आज पुन्हा अनेक गाड्या एकमेकंवर धडकून जीवघेणा अपघात झाल्याने पुन्हा भय इथले संपेना असे स्पष्ट झाले आहे.
मागील काही दिवसांपासून नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रकने तब्बल आठ वाहनांना उडवीत झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आठजण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पुणे-बंगळुरू बाह्यवळणावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेली आग विझविली.प्रशांत गोरे (वय 32, रा. उस्मानाबाद) व राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अपघातात आठजण जखमी असून त्यापैकी चौघेजण गंभीर जखमी आहेत. प्रेमराज राणाराम बिष्णोई (वय 25, खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.बिष्णोई हा त्याच्या ताब्यातील 22 चाकी ट्रकमध्ये (आरजे.19, जीएस 4673) बंगळुरू येथून तब्बल 41 टन इतक्या वजनाचे लोखंड भरुन ते गुजरातमधील अहमदाबादला घेऊन जात होता. हा ट्रक रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ आला, तेथून स्वामी नारायण मंदिराजवळ पोचल्यानंतर ट्रकचा ब्रेक निकामी झाला. त्यातच तीव्र उतार लागल्याने ट्रकने समोरुन जात असलेल्या पाच कार, एक रिक्षा व दोन दुचाकींना उडविले. हा अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये तीन कार व रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
प्रवाशांना घेऊन जाणारा रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने रिक्षाचे नुकसान झाले. त्यामध्ये रिक्षाचालक राजेंद्र गाढवे यांच्यासह रिक्षातील प्रवासी जखमी झाले. तर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार प्रशांत गोरे हे देखील गंभीर जखमी झाले होते. तर अन्य आठ नागरिक या अपघातात जखमी झाले. सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकच्या डिझेलच्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर काही अंतरावर पुलावरच ट्रक थांबला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढत उपचारांसाठी रुग्णालयात पाठवून दिले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशांत गोरे, राजेंद्र गाढवे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.