पुणे– तळजाई येथे होऊ घातलेल्या आणि राजकीय वर्चस्वाच्या वादात सापडलेल्या जैववैविध्य पार्कबाबत आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींसह सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी स्थायी समिती, मुख्य सभा यांची मान्यता अगोदर घ्या आणि नंतर काही समस्या निर्माण होत असतील तर आपल्यापर्यंत घेऊन या असे सांगितले. दरम्यान आपला विरोध प्रकल्पाला नसून त्यासाठी होत असलेली वृक्ष तोड आणि बेकायदा बाबी यास असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले,’ आज अजित दादांनी तळजाई बाबत माहिती घेतली तेथील १०८ एकर जागा , सुप्रीम कोर्टाचे आदेश, प्रशासनाचे म्हणणे , आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींचे मत त्यांनी ऐकून घेतले.आणि या प्रकल्पास मुख्य सभेची मान्यता नसल्याचे निदर्शनास आणून देताच , अगोदर महापालिकेच्या स्थायी समितीची हवे तर मुख्य सभेची मान्यता घ्या ,सर्व जन एकत्रित बसून पुण्याच्या हिताचा ,पुण्याला एक चांगला प्रकल्प द्या असेच निर्देश अजितदादांनी दिल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले. माझे तर असे म्हणणे आहे कि , राज्य सरकार जोपर्यंत हि जागा पार्कची आहे डोंगर माथा डोंगर उतार आहे ,कि बीडीपी झोनची आहे याबाबत निर्णय घेऊन तो घोषित करीत नाही तोवर प्रशासन मुख्य सभेत प्रस्तावच ठेऊ शकत नाही . येथे वृक्ष तोड करणे, बेकायदेशीर मार्गाने प्रकल्प रेटून नेणे यास आपला विरोध आहे.महापालिकेने राबविलेल्या सोलर प्रकल्पांची अगोदर माहिती घ्यावी नंतर येथे कशा पद्धतीने कोणी हा प्रकल्प राबवावा याबाबत निर्णय घ्यावा असा टोला हि जगताप यांनी मारला.