पुणे, दि. 23 जुलै 2020 : मावळातील सुधागडच्या तोंडावर व घनगडाच्या समोर गिर्यारोहकांना साद घालणाऱ्या 3322 फुट उंचीच्या दोन अजस्त्र कातळभिंतीच्या कुशीत असलेले अतिदुर्गम तैलबैला गाव (ता. मुळशी, जि. पुणे) ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा अभूतपूर्व तडाखा बसल्यामुळे अंधारात गेले होते. मात्र तब्बल 49 वीजखांबांची जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा महावितरणने उभारल्यानंतर ऐतिसाहिक तैलबैला गाव प्रकाशाने लखलखत आहे.
मुळशी तालुक्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेवर घाटमाथ्यावर असलेले आणि मुळशी धरण भागातील शेवटचे टोक असलेले तैलबैला गाव पुण्याहून 100 किलोमीटर तर लोणावळ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. अतिदुर्गम डोंगरदऱ्यातील पण विद्युतीकरण झालेल्या भांबुर्डे, गुटके, आसनवाडी, एकोले व तैलबैला या पाच गावांची भांबुर्डे ही गटग्रामपंचायत आहे. या गावांना महावितरणकडून माले उपकेंद्रातून कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. गेल्या महिन्यात ‘निसर्ग’ चक्रावादळाने या घाटमाथ्यावरील पाचही गावांमध्ये होत्याचे नव्हते केले. सोबतच माले उपकेंद्रातून शेवटचे टोक असलेल्या तैलबैला गावापर्यंत जाणाऱ्या 90 किलोमीटर लांबीच्या कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीचे तब्बल 127 वीजखांब अक्षरशः जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे 40 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.
डोंगरदऱ्या, घनदाट जंगलातील धुके, संततधार पाऊस, खळाळून वाहणारे आढे, नाले, चिखलमय व निसरड्या वाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर सुमारे 15 दिवसांत कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीवरील 79 वीजखांबांची यंत्रणा पुन्हा उभारण्यात आली व तैलबैला गाव वगळता सर्व गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्पाने पूर्ववत करण्यात आला. ही वीजवाहिनी 99 टक्के कार्यान्वित झाली होती. मात्र वीजवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम असलेल्या तैलबैला गावात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी जमीनदोस्त झालेले आणखी 48 उच्चदाब वीजखांब उभारणे गरजेचे होते. भांबुर्डे गावापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा ही यंत्रणा उभारण्याचे काम अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु झाले होते.
दरम्यान मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे नवीन वीजखांब वाहून नेणे, ढगांच्या धुक्यात व भरपावसात काम करणे, दिवसा कमी प्रकाश असल्याने तसेच डोंगरदऱ्या व जंगलात अपघाताचे धोके टाळून वीजयंत्रणा उभारण्याचे काम अतिशय खडतर होते. सुरवातीला सलग दोन-तीन दिवस सतत पाण्यात राहून काम केल्यामुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी दोन-तीन दिवसाआड एक दिवस आळीपाळीने दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.
जगाच्या संपर्काबाहेर राहून खाण्यापिण्याचे हाल सोसत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ऐतिहासिक तेलबैला गावाला प्रकाशमान करण्याचा विडा उचचला. जंगलात झाडांच्या फांद्यामध्ये विस्कटून पडलेल्या तारा काढणे, संततधार पावसात नवीन वीजखांब रोवणे, तारा ओढणे आदी कामे त्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने अविश्रांतपणे केले. तैलबैला गावाच्या वीजपुरवठ्यासाठी उच्चदाबाचे 48 व लघुदाबाचा एक अशा 49 वीजखांबांची यंत्रणा उभारली. या अथक व खडतर परिश्रमानंतर तेलबैलातील वीजजोडणी असलेले 40 घरे पुन्हा एकदा प्रकाशाने उजळली आहेत. ग्रामस्थांनी महावितरणच्या या कामगिरीचे कौतुक केले.