पुणे-महावितरणने गेल्या १४ वर्षात यशस्वीपणे वीजेच्या क्षेत्रातील अनेक आव्हाने झेलली असून यासाठी कंपनीच्या कर्माचा-यांनी कठोर परिश्रम करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊन महावितरणाला विद्युत क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे, असे मत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री सुनील पावडे यांनी आज महावितरणच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
महावितरणच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे प्रादेशिक विभागाच्या प्रकाश भवन स्थित कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सचिन तालेवार, अधीक्षक अभियंते सर्वश्री शंकर तायडे (संचालन, प्रादेशिक कार्यालय), उत्क्रांत धायगुडे ( पायाभूत आराखडा, प्रादेशिक कार्यालय), पंकज तगलपल्लीवार (गणेशखिंड मंडळ), उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री एकनाथ चव्हाण, प्रभारी उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदीप सातपुते, इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारनियमनाचा प्रश्न निकाली काढत असतांना वितरण यंत्रणेत सुधारणा करून ग्राहकाला दर्जेदार वीज पुरवठा करण्यासह अनुषंगिक सेवाही चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्व अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या सेवा पुरविण्यात येत आहे. महावितरणकडे पुरेशी वीज उपलब्ध असून मागेल त्याला वीज देण्यासाठी महावितरण सज्ज आहे. महावितरणला गेल्या १४ वर्षाच्या कालखंडात अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागला. त्यासाठी कर्मचारी व अधिकारी यांना प्रचंड मेहनत करावी लागली, असे मत श्री पावडे यांनी व्यक्त केले.
तत्कालीन महाराष्ट्र वीज मंडळाच्या पुनर्रचनेच्या नंतर अस्तित्वात आलेल्या महावितरणने भारनियमनावर मात करीत देश्यातील सर्वात मोठी वितरण कंपनी व आशिया खंडातील दुस-या क्रमांकाची वितरण कंपनी होण्याचा मान प्राप्त केला असून भविष्यातील सर्व आह्वाने पेलण्यास महावितरण सक्षम असून ग्राहकांना योग्य व दर्जेदार सेवा देण्यात यशस्वी झाली आहे, असे मनोगत श्री तालेवार यांनी यावेळी व्यक्त केले.उपकार्यकारी अभियंता श्री संतोष पाटनी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.