पुणे,- मनपाच्या ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता नवीन खरेदी करण्याऐवजी आहे तेच 6299 टॅब अद्यावत करून वापरावेत अशी मागणी आज एका पत्राद्वारे स्थायी समिति च्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी स्टँडिंग कमिटी चेयरमन असताना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडील ८ वी १० वी च्या विद्यार्थ्यांना इलर्निंग सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून अंदाज पत्रकात भरघोस तरतूद करून दिली होती. त्या निधी मधून मध्यवर्ती भांडार विभागामार्फत सन 2016 रोजी कार्यादेश क्रमांक 948 द्वारा 6299 टॅब माध्यमिक शिक्षण विभागाकडील ८ वी १० वी च्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेले आहेत. हे टॅब माध्यमिक विभागाकडील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. ह्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांचे हस्ते करण्यात आला होता.
हे टॅब अँड्रॉइड बेस असून त्यामध्ये आवश्यक असणारे ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्ट साहित्य विकत घेण्यात आलेले होते. त्यापोटी पुणे महानगरपालिकेने चार करोड 64 लाख 23 हजार 630 रुपये खर्च करण्यात आले.
सदरील टॅब हे माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांमध्ये उपलब्ध असून तेच टॅब आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्ट, बालभारतीचे पुस्तके इत्यादी अद्यावत सिलेबस प्रमाणे सुसज्जित करून दिले तर विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होईल व वेळ सुद्धा वाचेल याकरिता आवश्यक असणारे किरकोळ रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स त्याच कंपनी कडून करून घेतल्यास करोनाच्या काळामध्ये आधीच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असताना ही बचत झाल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल असे ही अश्विनी नितीन कदम यांनी म्हटले आहे.