पुणे-
सध्या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आता जवळपास सर्वच महाविद्यालयांत ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली आहे. यामुळे सोयीं सोबत विद्यार्थ्यांना नविन अडचणी व आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले असले तरी विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट, कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉप ची उपलब्धता नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने आणि महाविद्यालयाने मार्ग काढणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्राला खीळ बसलेली आहे. अशा कठीण परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना एक रकमी फी भरणे शक्य नाही यासाठी सुलभ हप्ते देण्यात येण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये ज्या सेवा अगर योजना सद्य परिस्थितीमुळे राबविण्यात येऊ शकत नाहीत अश्या अनेक शिर्षकाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क कमी करण्याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबर अधिक विचार विनिमय होऊन निर्णय घेण्यात अधिक सुलभता वाढवणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी “विद्यार्थी हक्क आयोग” ची स्थापना करण्याचा विचार व्हावा व विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘कमवा व शिका’ योजनेचा विस्तार करून तिचे बळकटीकरण करण्याची गरज आहे.
यासंदर्भातील निवेदन पत्राद्वारे श्री. उदयजी सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिले व हे धोरण महाराष्ट्र भर राबविण्यात यावे असे खा.चव्हाण यांनी पत्रात म्हंटले आहे