पुणे-अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या आहेत. खासदारकीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुण्यातील पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की आज मी दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जुलैमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदलले आहे. भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे.
संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत जाणार की भाजपसोबत कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. आज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.
खासदारकीची मुदत मंगळवारी संपली –
संभाजीराजे छत्रपती यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवत कोल्हापूरच्या राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, संभाजीराजेंनी पराभवानंतर राजकारणापासून थोडी अलिप्तता स्वीकारली. यानंतर 2016 मध्ये भाजपने त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. पण सहा वर्षात संभाजीराजेंनी या पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत मंगळवारी संपली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले होते. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. याशिवाय, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने छत्रपती भाजपमध्ये जातील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती .