पुणे- अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं आज येथे दुःखद निधन झालं.त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. पण अखेरीस त्यांचे दुःखद निधन झाले.. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला. मध्यंतरी त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आलं होतं.२०११साली सिंधूताईंना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तेव्हापासून त्यांचं ‘सलाम पुणे ‘शी स्नेहपूर्ण नातं होतं.
सिंधुताईंचा खडतर प्रवास…
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.
त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.”मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे –
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे