पुणे-
संवेदनशील कवी रामदास पुजारी यांच्या ‘ आई – माझं जग ‘ या पहिल्या काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन डॉ. दिनेशकुमार त्यागी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, म.रा., पुणे यांचे व श्री.माधव गोगटे, सेवानिवृत्त, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना डॉ. त्यागी यांनी या कवितासंग्रहातील विविध कवितांचा परामर्श घेताना “जे न देखे रवी ते देखे कवी” अशा शब्दात गौरवोदगार काढून, कवीने विविध विषयांना हात घातला असल्याचे सांगितले. या कवितासंग्रहामध्ये आईबरोबरच माता वसुधंरेवरील कवितांचा स्वतंत्र विभाग असल्याचे नमूद करुन, कवी रामदास पुजारी यांनी प्रसिध्द निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांचेप्रमाणे निसर्गाच्या विविध पैलूंसंबंधी लेखन करावे अशी अपेक्षा श्री. माधव गोगटे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री श्रीमती मंदाताई नाईक यांनी पुस्तकाचे तीन ठळक भागांतील पहिल्या भागात आईवरील १८, दुसऱ्या भागात माता वसुधंरेवरील १८ तर तिसऱ्या भागात इतर विषयांवरील १९ अशा ५५ कवितांचा समावेश असल्याचे नमूद करून पुस्तकातील कवितांविषयी त्यांचे विचार व्यक्त केले. श्री. प्रकाश ठोसरे, डॉ. अरविंदकुमार झा, डॉ. शेषराव पाटील या सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य; श्री रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांनी तसेच श्री. पुजारी यांचे बालपणापासूनचे मित्र के.ई.एम. हॉस्पिटलचे सीनिअर कन्सलटंट डॉ. बाळासाहेब बांडे यांनी कवीविषयी व कवितांविषयी कौतुकाचे दोन शब्द व्यक्त करुन कवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी त्यांची पत्नी सौ.निलम, मुली कु. सुप्रभा व नुपूर,बहीण – भाऊ,नातेवाईक व ग्रामस्थ हेही सहभागी झाले होते.
वनाधिकारी असलेल्या कवी रामदास पुजारी यांनी त्यांची स्वर्गीय आई, माता वसुंधरा, निसर्ग, सृष्टीतील विविध घटकांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे सांगून सर्वांनी जन्मदात्या आई-वडीलांची काळजी घेण्याबरोबरच सर्वांची जीवनदाती असणाऱ्या माता वसुंधरेचे रक्षणासाठी वृक्षलागवड करण्याची गरज असल्याचे नमूद करून काही कवितांचे वाचन केले. तसेच त्यांनी सर्व मान्यवर, नातेवाईक व विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच आकर्षक स्वरुपात पुस्तक तयार करणाऱ्या वेदान्तश्री प्रकाशनचे श्री. सुनील गायकवाड (उंब्रजकर) यांचे व भंडारी मुद्रणालयाचे श्री. रमेश भंडारी यांचे आभार व्यक्त केले. श्री. सुनील गायकवाड यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडताना कवी, मुद्रक तसेच या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणाऱ्या श्री. प्रकाश बोरूडे व श्री. तुषार वैद्य यांचे आभार व्यक्त केले.
या आगळयावेगळया प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन बायोस्फिअर्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी त्यांचे खास शैलीत केले. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, पुणेचे कार्याध्यक्ष श्री. सुनील भिडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटकेपणाने केले.
माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.