पुणे : अवघ्या दहा रुपयात थाळी, ही संकल्पना नुकतीच रुजू झाली आहे. त्याचा महिलांना उद्योगक्षेत्र म्हणून कसा उपयोग करुन घेता येईल, हे पहायला हवे. या योजनेला केंद्र सरकारचा निधी आहे. केंद्र सरकारची अवस्था बोलाची कढी बोलाचा भात याप्रमाणे आहे. मात्र, आता कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे. त्यामुळे आम्ही चांगल्या यंत्रणा उभ्या करु, असे सांगत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी केंद्र सरकारवर टिका केली. तसेच महाराष्ट्रात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आलेले महाविकास आघाडी सरकार, याच सोनिया गांधी यांना यंदाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे पंधरावे वर्ष आहे. सप्ताहांतर्गत पर्व स्त्री शक्तीचे – महिला स्वयंरोगजार, मार्केटिंग व व्यक्तीमत्व विकास शिबीराचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी होते. यावेळी कमल व्यवहारे, अॅड.कमल सावंत, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, व्याख्याते दत्ता कोहिनकर, निवेदिता बडदे, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, नगरसेविका लता राजगुरु, वैशाली मराठे, डॉ.विकास आबनावे, सचिन तावरे, इंदिरा अहिरे, शिवानी माने, कार्यक्रमाच्या निमंत्रक प्राची दुधाने, अर्चना शहा, दुर्गा शुक्रे, पल्लवी सुरसे, वैशाली तावरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात पर्व स्त्री शक्ती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. हैद्राबाद येथील घटनेचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत पिडीत महिलेला आदरांजली वाहण्यात आली.
डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, महिला अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे महिलांनी योग्य वेळी प्रतिकार करणे व स्वमदत गट मोठया संख्येने तयार करणे महत्त्वाचे आहे. संवेदनशील नेते सोबत असतील, तर महिलांचा आत्मविश्वास वाढेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेक वेळा झालेल्या दुर्देवी घटनांच्या वेळी महिलांना बळ दिले आहे. कायद्याची योग्य अंमलबजावणी, त्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिलांना मदत करण्याच्या कार्याला संस्थात्मक रुप मिळाल्यास महिलांना खरी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्याधर अनास्कर म्हणाले, बचत गटांच्या माध्यमातून महिला स्वयंरोजगाराकडे वळतात. पैशाची बचत करुन कुटुंबाला आधार देण्याकरीता पुढे येतात. मात्र आज भारतात केवळ ५२ टक्के नागरिक बँकिंगच्या माध्यमातून बचत करतात. त्यामध्ये महिलांचे प्रमाण हे अवघे १२ टक्के इतकेच आहे. महिलांनी पैशाची बचत स्वत:जवळ केली, तर तो पैसा अनुत्पादित राहतो. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून पैशाची बचत व वृद्धी करण्याचा प्रयत्न महिलांनी करायला हवा.
मोहन जोशी म्हणाले, सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील दिव्यांग, कष्टकरी, अनाथ, विद्यार्थी यांसह महिला वर्गाकरीता अनेक उपक्रम राबविले जातात. महिलांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे, याकरीता स्वयंरोजगार, व्यक्तीमत्व विकास यामाध्यमातून आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. महिलांनी स्वयंरोजगाराकरीता निधी मिळवून स्वत: सक्षम व्हावे आणि स्वत:च्या कुटुंबाला देखील सक्षम करावे, हा यामागील उद्देश आहे. त्यातून देशाचा आर्थिक विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना शहा यांनी आभार मानले.