पुणे- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस मध्ये ‘ मोगरा फुलला’ चा भास होऊ लागला आहे. सोनिया गांधींचा वाढदिवस त्याकरिता दरवर्षीप्रमाणे होणारे कार्यक्रम आणि पाक विरुद्ध झालेल्या युद्धाच्या इंदिराजींच्या संग्रामाची सुवर्ण महोत्सवी आठवण युवा वर्गाला देणाऱ्या कार्यक्रमांची मंदियाळी सुरु असताना नेत्यांचे होणारे आगमन , आणि आलेली निवडणूक या पार्श्वभूमीवर आता ५ वर्षे कधीही न फिरकलेले माजी नगरसेवक, कार्यकर्ते देखील कॉंग्रेस भवनाच्या आवारातील गर्दीत दिसू लागले आहेत.शहरात राष्ट्रवादी आणि भाजपची अधून मधून झालेली जवळीक आणि याच दोन्ही पक्षांची एकमेकांवर जोरदार आघात करत वाढलेली ताकद बहुधा कॉंग्रेसला संजीवनी देणारी ठरेल असे वाटू लागल्याने ,आणि त्यात प्रदेश अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नाना पटोले यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमुळे आता कार्यकर्त्यांचा हा गोतावळा वाढत असला तरी कॉंग्रेसला मागे खेचणाऱ्या गेल्या १० वर्षाच्या वादळात सातत्याने कॉंग्रेसची मशाल ज्वलंत ठेवण्यासाठी शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि मोहन जोशी ,उल्हास पवार , आबा बागुल,अरविंद शिंदे,अभय छाजेड आणि पुत्र अविनाश बागवे यांच्या मदतीने सातत्याने घेतलेली मेहनत या गर्दीत आता ठळकपणे दिसून येणारी ठरते आहे. यांनी जेवढी आंदोलने गेल्या ५ वर्षात केली तेवढी आंदोलने कोणीच कधीच केली नव्हती . यातील ९५ टक्के आंदोलने हि सामान्य , मध्यमवर्गीय जनतेशी निगडीत असलेल्या अत्यंत जवळच्या प्रश्नांवर होती .तेव्हा कार्यकर्ते जमा करू पाहणाऱ्या याच नेत्यांना आता कॉंग्रेस भवनात उसळू पाहणारी गर्दी आणखी प्रेरणा देणारी ठरणार आहे. महापालिकेत आबा बागुल, अरविंद शिंदे आणि अविनाश बागवे यांच्या धडाडत्या तोफांपुढे १०० सैनिकांचा ताफा प्रभावहीन झाला तर कधी अधून मधून त्यांना साथ दिलेल्या एम आय एम , रिपब्लिकन आणि राष्ट्रवादीचाही चेहरा उघड पडला . त्यांच्या या लढ्यामुळे साहजिक त्यांना त्यांच्यावर सोडण्यात येणाऱ्या ‘सरकारी अस्त्रांचा ‘ हि सामना करावा लागलाच .पण अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आणि शिवाय एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंडे असलेली कॉंग्रेसची हि मंडळी बाजूला हटली नाहीत . आता ती देखील आता एकत्रित वावरायला लागल्याने कार्यकर्त्यांचे बळ हि वाढलेले दिसते आहे .एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलू लागलेला मोगरा आणि त्यात आता आज होणारी कन्हैया कुमारांची सभा या मोगऱ्याचा सुगंध कसा, कुठवर ,किती दरवळत नेणार आहे ते मात्र येता काळच स्पष्ट करणार आहे.