पुणे- खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी हि दुखः व्यक्त केले आहे ते म्हणाले,’ पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.
बापट यांचा गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात दबदबा होता. त्यांच्याकडे पुण्याच्या विकासाची दृष्टी होती. आपल्या माणूसकी असलेल्या स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. ते एका विशिष्ट पक्षाचे नेते असले, तरी बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. पुण्याचे प्रतिनीधी म्हणून ते लोकसभेत गेले, तिथेही त्यांनी आपल्या स्वभावाने छाप पाडली. त्यांनी कधीही कुणाशी वैर धरले नाही. दीड-दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो. अलीकडच्या राजकीय वातावरण अत्यंत द्वेषाचे झाले आहे. ते पाहताना खुप वाईट वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. – उल्हास पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते
सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे गिरीश बापट होते. पुण्यात त्यांची पोकळी भरून काढू शकणारा नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही. गेली चार दशके पुण्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रीय असणारा नेता पुणेकरांनी गमावला आहे. १९८५पासून माझी आणि त्यांची मैत्री होती. आम्ही महापालिकेत एकावेळी काम केले. पण आमच्या मैत्रीत अंतर पडू दिले नाही. त्यांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे.-अंकुश काकडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी