पुणे-खासदार गिरीश बापटांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले. फडणवीस गिरीश बापट अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते.यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले, “बापट यांच्यासोबत आमचे जवळचे संबंध होते, आमदार निवासात आम्ही १५ वर्ष एकत्र राहिलो आहे. गिरीश साहेब आमच्यासाठी जेवण बनवून आम्हाला खायला घालायचे, या माणसामध्ये माणसं जपायची कला होती, चपरासी पासून ते मंत्र्यांपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध होते.अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व जाणं ही भाजपची मोठी हानी आहे. अशी प्रतिक्रया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार.2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.