पुणे-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरके झाले आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहर आणि भाजपाचा आधारस्तंभ हरपला! – संजय काकडे
पुणे शहराचे खासदार गिरीश बापट साहेब यांचं नुकतंच निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींनी मनामध्ये गर्दी केली. अगदी आता धुळवडीच्या दिवशी मी बापट साहेबांना भेटलो. त्यांना रंगाचा टिळा लावला… आणि त्यांनीही मला रंग लावून आशिर्वाद दिला. यावेळी अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
भाऊ म्हणून गिरीश बापट सर्वांना परिचित होते. तसेच बापट साहेब म्हणून देखील त्यांची ओळख होती. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कुणीही, कुठेही त्यांना भेटू शकत. त्यांच्याशी बोलू शकत… कट्ट्यावर कार्यकर्त्यांसोबत बसून गप्पांचा फड रंगवावा तो बापट साहेबांनीच. इतका सहज वावर त्यांचा होता.
राजकारणात नगरसेवक, आमदार, मंत्री, आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश भाऊंचा आलेख कायम चढता राहिला. २०१९ मध्ये ते पुणे शहराचे खासदार देखील झाले. मी देखील यावेळी इच्छुक होतो. परंतु, माझ्याऐवजी त्यांना तिकिट मिळालं. तेव्हा कोणतीही नाराजी अथवा रुसवा-फुगवा न ठेवता मी या निवडणुकीत त्यांचा अतिशय जोमाने प्रचार केला.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे ते पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवून राजकारण व समाजकारण कसं करावं याचा वस्तुपाठ बापट साहेबांनी घालून दिला होता. त्यामुळं समाजात त्यांचं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण झालं. महाराष्ट्राची संस्कृती आणि विचारधारेला अनुसरूनच त्यांनी काम केलं.
बापट साहेबांचं वक्तृत्व ओघवतं होतं. खास पुणेरी शैलीत ते चिमटे काढत खुमासदार शैलीत भाषण करायचे. समाजाच्या, शहराच्या नेमक्या प्रश्नांची त्यांना जाण होती. पुण्याच्या राजकारणाचं व समाजकारणाचं बापट साहेब हे चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. त्यांचं योगदान विसरता येणार नाही. पुणे शहरासह महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच दशकं गिरीश बापट हे नाव कायम चर्चेत राहिलं.
बापट साहेबांच्या निधनानं पुणे शहरासह भारतीय जनता पार्टीचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे. निवडणूक असो की पक्षाचा कोणताही उपक्रम… बापट साहेब हे आधारस्तंभ होते. पुण्याची बारकाईनं माहिती असलेले, पुणेकरांचं मन जाणणारे असे बापट साहेब होते. त्यामुळं त्यांच्या निधनानं पुणे शहरासह भाजपाचा आधारस्तंभच हरपला आहे. आता त्यांच्या कार्यातून, आठवणीतून बापट साहेब आपल्यासोबत कायम सोबत असतील, असं मला वाटतं.ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, चिरशांती देवो.
माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीनं गिरीश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आम्ही आमचा आधार गमावला. त्यांना आम्ही भाऊ म्हणून हाक द्यायचो आणि ते मोठ्या भावासारखे धावून यायचे. भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो.
राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना बापटांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी ते म्हणाले, राजकारण करताना गिरीश बापट यांच्या सारखी मैत्री करावी. या गढूळ राजकारणामध्य गिरीश बापटांसारखी मैत्री ठेवावी.अशी प्रतिक्रिया अंकुश काकडे यांनी दिली.
आमदार सुनील टिंगरे म्हणाले,’ खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
डाॅ.पं.नंदकिशोर कपोते प्रसिध्द कथक नर्तक-खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. गिरीश बापट माझे चांगले मित्र होते.त्यांचे व माझे 1986 पासूनचे घनिष्ठ संबंध. त्यावेळी ते स्टँडींग कमिटी चे अध्यक्ष होते. व मी नुकताच दिल्ली हून आलो होतो.तेव्हा नृत्य क्लास घेण्यासाठी मला जागा नव्हती .त्यावेळी गिरीश बापटांनी मला महात्मा फुले वस्तु संग्रहालय येथे नृत्य क्लास घेण्यासाठी जागा दिली. गिरीश बापट आत्ता पर्यन्त माझ्या सर्व नृत्य कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहात.आमच्या सर्व परिवारा बरोबर त्यांचे घरगुती जिव्हाळ्याचे संबंध होते. आमच्या सर्व घरगुती कार्यक्रमांना गिरीश बापट आवर्जुन उपस्थित राहात. मला ते वेळोवेळी मदत करत. गिरीश बापट प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे सतत हसतमुख, विनोदी स्वभावाचे होते. त्यांच्या अशा जाण्याने माझ्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
“भाजपचे नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.
महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीश बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रिक्षा चालक कष्टकऱ्यांचा आधारवड हरवला-महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे
रिक्षा चालक कष्टकरी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र रिक्षा चालकांची बाजू लावून धरणारे तसेच त्यांचे प्रश्न सभागृहात मानून त्यांना न्याय मिळवून देणारे तसेच ए रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा ही संस्कृती पुण्यामध्ये ज्यांनी रुजवली, कोविड काळामध्ये रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कोविड काळामध्ये रिक्षा चालकांसोबत आरटीओच्या समोर आंदोलन केले, नेहमीच रिक्षा चालकांची कष्टकऱ्यांची बाजू लावून धरून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले,
गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्षा चालक कष्टकऱ्यांचे फार मोठे हानी झाली असून त्यांचा आधारवड आणि हक्काचा माणूस हरवला अशी भावना रिक्षा चालकांच्या व कष्टकऱ्यांच्या मध्ये शोक काळा पसरली असून हळ व्यक्त केली जात आहे,रिक्षा चालक कष्टकऱ्यांचा आधारवड हरवला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिले असून तमाम रिक्षा चालक व कष्टकऱ्यांच्या वतीने गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रशांत सुदामराव जगताप(अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीश बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.