मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली
मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.
जवळचा मित्र आज गेला
एकनाथ खडसे यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, गिरीश बापट यांचे निधन झाले. गेल्या अनेक वर्षाचा माझा सहकारी आज काळाने हिरवून घेतला. 35 वर्ष मी गिरीश बापट यांच्यासोबत काम केले. माझा जवळचा मित्र आज गेला.
गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ लोकप्रतिनिधी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.
58 वर्षांची साथ संपली
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर म्हणाले, गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला. शाळेपासून आम्ही एकत्र होतो, अठ्ठावन वर्षांची ही आमची साथ संपली याचे फार दुःख होत आहे. आमदार, खासदार तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले. आणिबाणीच्या लढाईपासून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या जबबादाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आज असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मनःपूर्वक श्रद्धांजली..!
आठवण कायम येत राहील.–अजितदादा पवार (विरोधी पक्षनेता ; विधानसभा )
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहोचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. १९९५ पासून २०१४ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. २०१९ ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारानं लढत होते. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रिय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांप्रती, कार्यकर्त्यांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.