पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ‘जनसंवाद’ पदयात्रा काढण्यात येत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कोथरूड विधानसभा मतदार संघातील कर्वे पुतळा येथून ‘जनसंवाद’ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे नियोजन ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी केले होते. ही पदयात्रा कर्वे पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – सुतार दवाखाना गुजरात कॉलनी – संगम चौक – कोथरूड पोलीस ठाणे – जय भवानी नगर – किष्किंधा नगर पर्यंत काढून पदयात्रेचा समारोप राजमाता जिजाऊ नगर, सुतार दर येथे सभा घेवून करण्यात आला.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण मिळवण्यात आले होते, गरिबीचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकाराने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले पण मागील ९ वर्षापासून केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारीत वाढ झाली, शेती व शेतकऱ्याला संपवण्याचे काम सुरु आहे. संविधानिक संस्था संपवण्याचे काम केले जात आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड नाराजी असून भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची भावना जनतेमध्ये दिसून येत आहे.’’
यानंतररामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील ९ वर्षात जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ मुठभर उद्योगपती मित्रांसाठीच काम केले आहे. सातत्याने खोटं बोलणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला हे देशाचे दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा मित्रोंच्या खिशात घालण्याचे एकमेव काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही त्यामुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली आहे या जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येत आहे.’’
यावेळी माजी आमदार अनंत गाडगीळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, विजय खळदकर, अजीत दरेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र माझीरे, लता राजगुरू, यशराज पारखी, सुधीर काळे, शिवाजी भोईटे, मारूती माने, किशोर मारणे, अजीत जाधव, आशितोष शिंदे, चैतन्य पुरंदरे, गुलाम खान, प्रथमेश लभडे, अजीत ढोकळे, विद्या लवार्डे, गीता चोरगे, वदंना पोळ, शोभा भगत, नंदिनी कवडे, मेघा शिंदे, सुंदरा ओव्हाळ, उषा राजगुरू, अश्विनी गवारे, राजू ठोंबरे आदींसह चंदूशेठ कदम मित्र परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सौ. नयना सोनार यांनी मानले.