पुणे-कसबापेठ विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मागील अनेक वर्षे भाजपला साथ दिली. मात्र, भाजपने या मतदार संघातील मतदारांचा परिवारातील म्हणून केवळ वापर केला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजीत अभ्यंकर यांनी केला. सत्तापिसाट आणि धर्मपिसाट झालेल्या भाजपचा पराभव होणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॉ. अभ्यंकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेना व सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. अभिजीत वैद्य, घरकामगार संघटनेच्या सचिव सरस्वती भांदिर्गे उपस्थित होते.
कॉ. अभ्यंकर म्हणाले, राज्यपाल, पोलीसांपासून ते निवडणूक आयोगापर्यंत सर्वच घटनात्मक यंत्रणा या सत्तेच्या आधीन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेले सत्तांतर हे सूडाच्या राजकारणाचे एक उदाहरण आहे. या सर्वांमधून महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला जात आहेच. महाराष्ट्राच्या विकासाला आणि जनतेलाच ओलीस धरण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात कसबा मतदारसंघात होत असणाऱ्या निवडणूकीत देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते राज्याचे सर्व मंत्रिमंडळ आपल्या जबाबदाऱ्या आणि कामे सोडून उतरले आहेत. त्यातून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, न्यायव्यवस्था झाली रखेल, हे अण्णाभाऊंनी पूर्वी म्हंटले आहे. त्याची प्रचिती आज देशात व राज्यातील जनतेला येत आहे. लाचार तो वजीर अशी परिस्थिती आज आहे. लोकशाही, संविधान व प्रशासन या संकल्पना उध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कसबा मतदार संघाला मोठा इतिहास आहे. अनेक थोर समाजवादी नेते घडले. अनेक समाजिक संस्था व संघटनांचा उदय झाला, या सर्वांनी सुरूंग लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या मतदार संघात सातत्याने भाजपचा विजय होतो, हा भ्रम दूर झाला पाहिजे. ही पोटनिवडणुक हा भ्रम दूर करणारी आणि २०२४ च्या परिवर्तनाची सुरूवात असेल.
सरस्वती भांदिर्गे म्हणाल्या, मोदींचे सरकार आल्यापासून आमच्या घरेलू कामगारांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्हाला महागाईचे चटके बसलेले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात प्रचारात उतरत आहोत. पाच हजार घर कामगार महिला घरोघरी पत्रके वाटप करत आहेत.