पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२२:छत्रपती शिवाजी महाराज यांनी नैतिकता व चारित्र्याचे अधिष्ठान देत जातीधर्माऐवजी माणुसकीच्या मूल्यांवर हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे हे स्वराज्य खऱ्या अर्थाने रयतेचे ठरले असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व लेखक श्री. राजेंद्र घाडगे यांनी रविवारी (दि. १९) केले.
महावितरण व महापारेषणच्या वतीने रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री. राजेंद्र घाडगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता श्री. विवेक मुंडे (महापारेषण) यांची उपस्थिती होती.
श्री. घाडगे म्हणाले की, स्वराज्य उभारणी म्हणजे केवळ लढाया किंवा राज्याचा भौगोलिक विस्तार नव्हता. तर स्वराज्य हे प्रत्येकासाठी, सर्व रयतेसाठी स्वाभिमानाने, सुखाने व स्वकर्तृत्वाने जगण्यासाठी होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, सर्वसामान्य रयतेसाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकर्तृत्वावर केली. स्वराज्यापूर्वी रयतेची स्थिती अतिशय दीन होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व शून्यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले व त्याची व्यवस्थित घडी बसविली. व्यवस्थापनाचे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने गुरू आहेत. स्वराज्य उभारणीसाठी केलेल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी नवीन विचार व आत्मविश्वास दिला.
यावेळी श्री. महेश कारंडे यांनी गीते व श्री. शहाजी साठे यांनी पोवाडा सादर केला. त्यांना शुभम ताठे व आदित्य केळकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर अहिवळे तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले. श्री. तुकाराम डिंबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.