कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : सोळाव्या शतकात तीन महान सत्पुरुषांनी अलौकिक सामर्थ्याने हा महाराष्ट्र धर्म जगवला आणि जागवला. समर्थांनी महाराष्ट्राचा मेंदू तयार केला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राचे मन तयार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे मनगट तयार केले. मन, मनगट आणि मेंदू याचे एकत्रिकरण झाले आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी साम्राज्य उभे राहिले. अशा या सत्पुरुषांच्या विचारांचे अनुकरण सर्वांनी केले पाहिजे, असे मत ह.भ.प. ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, समर्थांच्या व्यक्तिमत्वामध्ये भक्ती, शक्ती आणि युक्तीचा एक अनोखा संगम आहे. मानवी मूल्यांचे मोजमाप करताना समर्थ सांगतात विश्वातील प्रत्येक वस्तूही नाशवंत आहे. शरीर देखील नाशवंत असले तरी विचार हे अमर असतात. संत देहाने जरी निघून गेले तरी संतांचे विचार आजही समाजाची धारणा करतात. संतांच्या जीवनाचे अनुकरण करत असताना देव, देश, धर्म यासाठी मानवाने जगावे आणि मरावे ही शिकवण विसरू नये.