मेट्रो पुणेकरांचा अंत पहात आहे. काम सुरू झाल्यापासून ७ वर्षे आतापर्यंत पुणेकर मेट्रो मार्गावरील वाहतूक कोंडीचा, रस्त्यांवरील खड्ड्यांचा, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करत आहे. मात्र भाजपला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही
पुणे: पुणेकर आतुरतेने वाट पहात असलेल्या पूर्ण मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे की नाही? या विलंबाला नक्की कोण जबाबदार आहे असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. भारतीय जनता पक्षाने हा पुणेकरांच्या स्वप्नाबरोबर खेळच चालवला आहे.
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक लक्षात घेत पंतप्रधानांच्या हस्ते घाईघाईत फक्त ५ किलोमीटर मार्गाचे उदघाटन दि. ६ मार्च २०२२ रोजी केले. त्याला आता सव्वा वर्ष झाले. या सव्वा वर्षाच्या कालावधीत मेट्रोची धाव १ इंचही पुढे गेलेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील वायद्यावर वायदे करत आहेत. या वर्षीचा जानेवारी झाला, मग मार्चही झाला, त्यानंतर महाराष्ट्र दिनाचा मुहुर्त सांगून झाला, मात्र तोही होऊन गेला आणि आता जून उजाडला तरी मेट्रो अद्याप पूर्ण सुरू झालेली नाही असे मोहन जोशी म्हणाले.
पुणेकरांना रोजची वाहतूक कोंडी आता नकोशी झाली आहे. त्यावरचा उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने मेट्रोचा ११ हजार ५०० कोटी रूपये इतक्या अगडबंब खर्चाचा प्रकल्प सुरू केला. तो बहुधा भ्रष्टाचारासाठीच केला असावा अशी शंका आता पुणेकरांना येऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर २०१६ रोजी भूमी पूजन केल्यापासून आता ७ वर्षे झाली तरीही अजून काम सुरूच असल्याचे सांगण्यात येते. याचा काय अर्थ घ्यायचा? हा प्रकल्प आता नक्की कशाची वाट पाहतोय? की उदघाटनांचा प्रचंड सोस असलेल्या पंतप्रधानांना भाजपच्या नेते पुन्हा पुण्यात आणणार आहेत हे त्यांनी एकदा जाहीर करावे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वायद्यांचा पुणेकरांना आता कंटाळा आला आहे. त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे.
पुणेकरांना आम्ही मेट्रो दिली असे भाजपच्या पुण्यातील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र ही मेट्रो पुणेकरांचा अंत पहात आहे. काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुणेकर मेट्रो मार्गावरील वाहतूक कोंडीचा, रस्त्यांवरील खड्ड्यांचा, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करत आहे. मात्र भाजपला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही असे दिसते आहे. असेल तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे पूर्ण मेट्रो सुरू होण्याची एकच तारीख जाहीर करावी असे काँग्रेसचे त्यांना आव्हान असल्याचे मोहन जोशी म्हणाले.