मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन
पुणे, दि. ०६ जून २०२३: तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन होऊन ग्राहकसेवा व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीची २००५ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर गेल्या १८ वर्षांमध्ये अनेक आव्हानात्मक स्थित्यंतरांतून यशस्वी मार्गक्रमण करीत व वीजग्राहकांना केंद्रबिंदू ठेवून देशाच्या वीजक्षेत्रात महावितरणने महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गगनभरारी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मंगळवारी (दि. ६) केले.
रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित महावितरणच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, डॉ. सुरेश वानखेडे तसेच सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की नव्वदीच्या दशकात निर्माण झालेल्या वीजसंकटावर राज्य व केंद्र शासनाच्या आधाराने महावितरणने यशस्वी मात केली आहे. ‘फयान’, ‘तौक्ते’, ‘निसर्ग’, यासारखे भयंकर चक्रीवादळे, राज्यातील प्रलयकारी महापूर आणि कोविड-१९ संसर्गाच्या कालावधीत जीवावर उदार होऊन महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. फोटो मीटर रीडिंगचे पेटंट घेतले आहे. तसेच मोबाईल ॲपद्वारे अचूक रीडींगद्वारे ग्राहकांना वीजबिल देण्यात येत आहे. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारी देखील नगण्य झाल्या आहेत. यापुढेही सर्वच ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.
यावेळी महावितरणच्या मृत कर्मचाऱ्यांच्या ५ वारसांना तसेच विद्युत सहायक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून निवड झालेल्या तीन उमेदवारांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी केले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.