आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा खासदार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असून २०२४ च्या निवडणुकीनंतर विकासाची गती वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रकाश जावडेकर बोलत होते.,माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रा. मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षे एका पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले एनडीए सरकार आहे. त्यामुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले. लोकांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास ही आमची मोठी ताकद आहे. 2024 साली लोकसभा निवडणुकीत 350 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए ला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा आमचा ठाम विश्वास आहे. देशाला विकसीत भारत, होण्याच्या दृष्टीने मोठी वाटचाल झाली आहे व 2024 नंतर विकासाची गती आणखी वाढेल.
प्रधानमंत्री मोदी यांनी विकासाचे सकारात्मक राजकारण केले. विकासाचा लाभ देण्यात जात, धर्म, प्रांत, लिंग, मतदाराचा कल या कोणत्याही कारणावरून भेद केला नाही. जनतेनेही स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास ह्या सूत्रावर मोठी प्रगती झाली.
मध्यमवर्गाला शांतता, सुबत्ता, सुलभ सुविधा आणि विकासाच्या विपुल संधी हव्या असतात. 2004 ते 2014 या कालखंडात विविध शहरात होणारे बॉम्बस्फोट संपले, माओवाद्यांचा प्रभाव 90 टक्के कमी झाला. जम्मु काश्मीर व पूर्वोत्तर राज्यात विकास व शांतता वाढली. 7 लाख उत्पन्नावर आता आयकर भरावा लागत नाही. रेरा, सेल्फ ॲटेस्टेशन, शासकीय सेवा ऑनलाईन, फेस लेस ॲसेसमेंट, ई रिटर्न फायलींग, 15 दिवसात रिफंड, मूलभूत सुविधांचा विकास आणि 1 लाख रेराअंतर्गत तक्रारीचा झटपट निपटारा याशिवाय अपूर्ण घरबांधणी प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी 25 हजार कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले. आर्थिक प्रगतीमुळे विकास व रोजगाराच्या संधी वाढल्या.
डिजिटल इंडिया मोहीमेने अदभूत यश मिळवले. जगात सर्वात जास्त डिजीटल व्यवहार भारतात होतात, भीम, यूपीआय, को-विन ही ॲप जगभर सर्वोत्कृष्ट ठरली. सोशल प्लॅटफॉर्मवर 60 कोटी भारतीय आहेत.
जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. जेव्हा अमेरीका, चीन, युरोप यांचा विकासाचा वेग 2-4 टक्के असताना भारताच्या विकासाचा वेग 7% आहे. जागतिक बँक, मॉनिटरी फंड, मॉर्गन स्टॅन्ले सारख्या संस्थांच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. युरोप मधील अनेक देशात मंदीचे सावट आहे, पण भारताची वेगवान प्रगती चालू आहे आणि गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारींचा दर ही कमी झाला आहे.
महागाईचा दर इंग्लंड 9 टक्के, युरोप 8 टक्के अर्जेंटीना 100 टक्के, ब्राझील 24 टक्के, इंडोनेशीया 9 टक्के असताना भारताने उत्तम आर्थिक व्यवस्थापन करीत हा दर सातत्याने 5 टक्के च्या खाली ठेवण्यात यश मिळविले.
आपली निर्यात सतत वाढून ती 750 बिलियन यापेक्षा जास्त झाली, परकीय चलनाची गंगाजळी अत्युच्च पातळीवर आहे. यामुळे भारत हे जगात होणाऱ्या गुंतवणूकीचे आकर्षण केन्द्र बनला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत एक चमकता तारा म्हणून ओळखला जातो. औद्यौगिक, शेती आणि सेवा क्षेत्रांचा सतत विकास, मजबूत मागणी आणि सुधारणा यामुळे हे घडून आले.
50 हजार किमी. चे नवे हायवे, 4 लाख किमी. चे ग्रामीण रस्ते, 70 नवे विमानतळ आणि 111 नवे जलवाहतुक मार्ग, 20 शहरात मेट्रोची प्रगती, 18 वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे मध्ये मोठी गुंतवणूक, सुमारे 70 छोट्या बंदरांची निर्मिती, उडान योजना, स्वच्छ रेल्वे स्टेशन, हा प्रत्यक्ष विकास सर्व जगात वाखाणला जातो.
100 कोटी नागरिकांना मोफत कोविड प्रतिबंधक लस, 80 कोटी नागरिकांना गेले 35 महिने मोफत रेशन, 50 कोटी नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज, 11 कोटी शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी प्रत्येकी 26 हजार रुपये, 48 कोटी नागरिकांची जनधन खाती, महिलांना नवीन व्यावसायासाठी योजनेतून कर्ज, 30 कोटी नागरिकांना सुरक्षा विमा तर 13 कोटी नागरिकांना जीवन विमा, 11 कोटी घरात शौचालय, 10 कोटी महिलांना उज्वल गॅस योजना, 10 कोटी घरात नव्याने नळ जोडणी, 3.5 कोटी नागरिकांना प्रधान मंत्री आवास, 3 कोटी घरात वीज असा जन कल्याणकारी योजनेतून गरीबांना सक्षम बनवले.
शेतकऱ्यांना एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक देण्याचा क्रांतिकारी निर्णय अमलात आणला, विमा योजनेत शेतकऱ्यांना 1 लाख 33 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली. 1260 ई मंडीमुळे शेतकरी आपला माल कुठेही पाठवू शकतात.
खतांच्या अनुदानात 5 पट वाढ, शेती अर्थसंकल्पात 5 पट वाढ, 10 कोटी शेतकऱ्यांना मृदा संधारण कार्ड, 20 लाख कोटींचे शेती कर्ज या सर्वाचा परिणाम धान्य उत्पादन व निर्यात वाढली.
370 कलम हटवल्यांनातर काश्मीर मधील दगडफेक संपली, आतंकवाद कमी झाला, देशी-विदेशी गुंतवणूक व पर्यटन सतत वाढत आहे. आता तो प्रदेश मोठी प्रगती करीत आहे.
केदारनाथ, महाकाल, सोमनाथ, काशी, देवधर, चारधाम, करतारपूर साहेब या सांस्कृतिक वारसाच्या महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांचा विकास,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या 5 स्थानांचा विकास, सरदार पटेल व नेताजी बोस यांचे पुतळे अशी अनेक कामे 9 वर्षात झाली.
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची ‘देश प्रथम’ निती त्यासाठी सतत कष्ट आणि ‘सन्यस्त कर्मयोगी’ ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे.
नऊ वर्षाच्या कामाचा अहवाल 20 कोटींहून अधिक घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देणार आहेत.