पुणे:
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिकेत पहिल्यांदाच 93 टक्के गुण संपादन करणारे विद्यार्थी राजीव गांधी इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यलयात घडत आहेत याचा अभिमान असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेला २८३ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अनुष्का टेमगिरे [ ९३ टक्के ] सानिका देवकुळे [ ९१ टक्के ] विराज चिंटा [ ९० टक्के ] या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच महानगरपालिकेच्या विद्यालयात वर्षिका मुथ्था हिने गणितात शंभर पैकी शंभर तर मल्टिस्किल या विषयात अनस बैग याने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही आबा बागुल यांनी नमूद केले .