‘आंबील ओढा’ पुस्तकाचे शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे- दक्षिण पुणे म्हणजे निसर्गाची मुबलक संपदा लाभलेलं पुण्याचं दक्षिण द्वार..कात्रजचे जंगल, पेशवेकालीन धरणे (ज्याची आता तळी म्हणून उल्लेख करता ते) कात्रजच्या घाटातून उगम पावलेला आंबील ओढा आणि धरणातून पुण्याला होणाऱ्या भुयारी पाणीपुरवठा मार्ग,अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी केलेला आंबील ओढ्याचा वापर,कधी काळी या दोन्ही धरणांच्या आसपासच्या जंगलात आढलेली प्राणी मात्रा.. या नैसर्गिक संपदेची माहिती घेऊन हि संपदा कोणी कशी उध्वस्त केली याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार सांगतील काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यास कारण हि तसेच आहे ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि.२७) अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तत्कालीन आयुक्त संजय कुमार यांच्याकडे पेशवेकालीन भुयारी यंत्रणा जतन करण्यासाठी दिलेल्या अहवालाला दिलेली तिलांजली,आणि तत्पूर्वी बालाजी राव जेव्हा कात्रजच्या जंगलात रानगवा पाहायला आले होते तेव्हाच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी केलेल्या विनवण्या काळाच्या उदरात गडप झाल्या.पण निसर्गाची हानी करणारांची नावे इतिहासात राहतील.पण ती जाहीर होणार नाहीत या पार्श्वभूमीवर अजितदादा या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत हि बाब महत्वाची मानली जाते आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अजितदादा काय पावले उचलतात हे त्याहून महत्वाचे मानले जाते.
भौगोलिक माहिती प्रणालीचे संशोधक आणि ग्राफियाज सोल्युशन्सचे संचालक डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. २७) दुपारी १२.४५ वाजता साज हॉल, सिद्धी गार्डन, डी. पी. रोड पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून, ग्राफियाज सोल्युशन्स आणि वंचित विकास पुणे या संस्थांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम आयोजिला आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत गबाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी मंजुश्री पारसनीस आणि देणगीदार दत्ता पुरोहित आदी उपस्थित होते.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून आंबील ओढा विषयावर काम करत आहे. पुण्यासह शेजारील गावांवर या विषयासंबंधी पीएचडी केली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदनाचा वापर करून शहरातील पाणवठे, नैसर्गिक प्रवाह, झरे, भौगोलिक स्थिती, भूशास्त्र, भूगर्भातील परिस्थिती, पावसाचे मापदंड, जैविक घटकांशी संबंध, परिसरातील वाढती लोकसंख्या, सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार नैसर्गिक प्रवाहासाठीचे नियम व या संबंधित इतर समस्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे. मंजुश्री पारसनीस या परिसरात राहत असून, त्यांचा जैवविविधता, पर्यावरण शास्त्रावर सखोल अभ्यास आहे. २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आंबील ओढ्यातील जैवविविधता आणि पर्यावरण शास्त्र या अनुषंगाने लेखन केले आहे.”
या पुस्तकात ऐतिहासिक आंबील ओढ्याची पेशवेकालीन स्थिती आणि आता त्यामध्ये झालेला कायापालट यावरही प्रकाश टाकला आहे. येथील समस्यांवर शास्त्रशुद्ध उपाय सांगण्याचा प्रयत्न यातून केला आहे. विकास आणि नैसर्गिक घटकांचा समतोल साधण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. शासकीय स्तरावर अहवाल बनविताना हा संदर्भग्रंथ ठरू शकेल,” असे डॉ. श्रीकांत गबाले यांनी नमूद केले