पुणे-महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अवमान जनक वक्तव्य करणारे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पर्वती येथे पेढे वाटून आनंद साजरा केला.
“एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे.जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता , परंतु त्यांनी तसे केले नाही. राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला अक्षरशः पायंदळी तुडविल्यानंतर अखेर आज कसबा व चिंचवड पोट निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पदावरून हटविले आहे , हे भाजपला उशिरा सुचलेले शहाणपणच आहे” , असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
या प्रसंगी प्रशांत जगताप ,माजी नगरसेविका प्रिया गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे विपुल म्हैसुरकर , मृणालिनीताई वाणी ,किशोर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.