भाजपाच्या अधिवेशनासाठी पुण्याचे विद्रूपीकरण कशाला ? संजय मोरेंचा सवाल
फ्लेक्स च्या अतिरेकाने पुणे बेजार
भाजपचे अधिवेशन आणि पुण्यात पाण्याची मारामार-भाजपचे अधिवेशन पुण्यात होत असताना एकीकडे फ्लेक्सच्या माऱ्याने ,वाढत्या उकाड्यात हवा अडविण्याचे काम केलेले असताना दुसरीकडे पुण्यात पाणी कपातीला प्रारंभ झाल्याने पुण्यात पाण्याची मारामार होती .पण भाजपच्या नेत्यांनी यावर ब्र काढला नाही.
पुणे-पक्षाची संघटनात्मक बांधणी जरूर जोमाने करावी त्यांना ती गरज आहेच ,पण त्यासाठी पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीत ढकलून , पुण्याला विद्रूप कशाला करता आहात ? असा सवाल शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या विद्रुपीकरण करण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष , उपमुख्यमंत्री अशा कोणीच कसा आक्षेप घेतला नाही ? कि त्यांचा यास पाठींबा होता अशी विचारणा मोरे यांनी केली आहे.
मोरे म्हणाले,’ मुंबईहून येताना जंगली महाराज रोडने जात होतो. रस्त्याचे एवढे विद्रुपिकरण झालेले कधी पाहिले नव्हते. भाजप म्हणजे त्यांनी काहीही केले कि ते नियमाप्रमाणे, इतर पक्षांनी केले कि नियमबाह्य ठरवले जाते. आणि त्वरीत कारवाई करून 3’×2′ फूटचा जरी फ्लेक्स लावला तरी प्रशासनावर दबाव टाकून काढला जातो. भाजपची कार्यकारी समितीची पुण्यात बैठक आहे. असावी, का असू नये ? प्रत्येक पक्ष आपल्या संघटनात्मक बांधणीसाठी हे करतच असतो. पण भाजपची कार्यकारी समिती बैठक म्हणजे काही वेगळे आहे का ? एवढी फ्लेक्सबाजी करून पुण्याचे विद्रुपिकरण केले आहे. पुणेकरांचे भले करण्याचा काही विषय तर या बैठकीत नाही. मग पुणेकरांनी हे विद्रुपिकरण का सहन करायचे ? भाजपचे राष्टीय अध्यक्ष पुण्यात येत आहेत तर त्यांचे हे स्वागत म्हणायचे कि एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावणारे अध्यक्षांना आपली ओळख याद्वारे करून देतात कि काय ? असा प्रश्न पुणेकरांना पडल्याशिवाय राहणार नाही. कार्यकारी समितीमधे पक्षांतर्गत विषय असणार .. पुणे शहराच्या विकासाचे या बैठकीत काही देणे घेणे नाही. आधीच विनाकारणाच्या अतिविकासाचा पुणेकर त्रास सहन करत आहेत. नको तो विकास आणि नको ते काँक्रिटीकरण अस पुणेकर म्हणतायत. यात आणखी वेगळी भर या फ्लेक्समुळे शहराच्या झालेल्या विद्रुपिकरणाची … या कार्यकारी समितीच्या बैठकीमधे अध्यक्षांनी सर्व फ्लेक्सधारकांची कानउघडणी करावी म्हणजे बैठक घेतल्याचे काहीप्रमाणात सार्थक होईल. आणि पुणेकर नागरीकांची शहर विद्रुपिकरण झालेले बघण्यापासून सुटका होईल.असेही मोरे यांनी म्हटले आहे…