आशा प्रतिष्ठानतर्फे ३५ गरजू विद्यार्थिनींना शालेय शिष्यवृत्ती प्रदानपुणे : “आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्य, परिश्रम व आत्मविश्वास गरजेचा असतो. मोबाईलचा आवश्यकतेप्रमाणे वापर करून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मिळालेल्या अर्थसाहाय्यातून चांगल्या रीतीने आपले शिक्षण पूर्ण करावे. समाजाने केलेल्या मदतीची जाण ठेवून त्याची परतफेड करण्याची भावना जोपासावी,” असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी देविदास घेवारे यांनी केले.
आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ‘आशा शिष्यवृत्ती सन्मान सोहळा’ पार पडला. ग्रामीण, दुर्गम भागातील, पुण्यातील वाडी-वस्ती भागातील गुणवंत आणि आर्थिक मागास ३५ विद्यार्थिनींना प्रत्येकी ३००० रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कला-क्रीडा क्षेत्रातील तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार भवन येथे झालेल्या सोहळ्यावेळी त्रिशरण एन्लायटनमेंट फाउंडेशनच्या संस्थापिका प्रज्ञा वाघमारे, ‘घे भरारी’ समूहाच्या नीलम उमराणी एदलाबादकर, ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय चव्हाण, आशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली लोणकर, सचिव चंदन डाबी, खजिनदार पुरुषोत्तम डांगी, प्रतीक डांगी, अनुजा निकाते, चंद्रकांत साने यांच्यासह ग्रामीण भागातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, “सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या मार्गावर चालण्याचे काम आशा प्रतिष्ठान करत आहे. मुलींसाठी अनेक सरकारी योजना, शिष्यवृत्त्या आहेत. त्याची माहिती आपण करून घ्यायला हवी. वंचित, दुर्गम घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवे.”
नीलम उमराणी एदलाबादकर म्हणाल्या, “लहान वयापासूनच छंद जोपासा. चांगला अभ्यास करा. उद्योजकतेचा संस्कार मुलांवर व्हायला हवा. जीवनात अनेक संकटे आली, तरी त्याचा जिद्दीने व आत्मविश्वासाने सामना करायला हवा.”
प्रा. डॉ. विजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंजली लोणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. गणेश ठाकर व पुरुषोत्तम डांगी यांनी सूत्रसंचालन केले. चंदन डाबी यांनी प्रास्ताविक केले. प्रतीक डांगी यांनी आभार मानले.