पुणे- दक्षिण पुण्याच्या निसर्ग संपदेत भर घालणाऱ्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावाच्या किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच साठला होता, अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू पावल्याने हा मोठा घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मासे कशामुळे मेली याचे कारण शोधले असता आजूबाजूला झालेली बेकायदा बांधकामे ड्रेनेज चे पाणी याच तलावात सोडत असल्याचे महापालिकेने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.ज्यामध्ये निवासी आणि व्यापारी बांधकामांचा समावेश आहे आता हि सारी ड्रेनेजस कशी बंद करावयाची हा महापालिके पुढील प्रश्न आहे . तूर्तास तरी सुमारे ४० ते ५० बांधकामांना नोटीसा देण्याचे धोरण महापालिकेने अंगिकारले असून त्यावर आता कार्यवाही सुरु होत असल्याचे वृत्त आहे.
२/३ दिवसांपूर्सवी सकाळी तलावाच्या किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या माणसांना हे मासे मरून पडल्याचे दृश्य दिसले, बहुतांश जणांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून व्हायरल केले. त्यामुळे जांभुळवाडी, कात्रज या परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ते दृष्य पाहण्यासाठी शेकडो लोकांची तलावाजवळ गर्दी झाली. छोट्या मासोळ्यांपासून ते तब्बल पंधरा-वीस किलो वजनाचे चार-साडेचार फुट लांबीचे मोठे मासे मरून पडले होते. त्यातील बहुतांश मृत माशांचा खच हा तलावाच्या काठावर साचला होता तर तलावात आठ दहा फुटांपर्यंत अनेक मृत मासे पाण्यावर तरंगलेले दिसत होते. दुपारी मृत मास्यांचा खच हटविण्यासाठी सुरवात केली होती. मात्र इकडे माशांचा खच काढला जात होता व दुसरीकडे माशांचे तडफडून मरणाचे प्रकार रात्रीपर्यंत सुरुच होते.
शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती. परंतू या परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द जांभुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे.त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या बांधकामा मुळे तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे.